शिवसेनेच्या आनंदावर मनसेचे विरजण
By Admin | Updated: June 9, 2014 23:46 IST2014-06-09T23:46:26+5:302014-06-09T23:46:26+5:30
इंग्रजांच्या राजवटीपासून असेलल्या कापसाच्या बाजारपेठेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उलथापालथीचे राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादीत राजू तिमांडे आणि अँड. सुधीर कोठारी यांच्यात तिकीटासाठी

शिवसेनेच्या आनंदावर मनसेचे विरजण
राजेश भोजेकर - वर्धा
इंग्रजांच्या राजवटीपासून असेलल्या कापसाच्या बाजारपेठेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उलथापालथीचे राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादीत राजू तिमांडे आणि अँड. सुधीर कोठारी यांच्यात तिकीटासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. समीर कुणावार यांची अपक्ष खेळी. यातच मनसेचे अतुल वांदिले यांची युवा ब्रिगेड या सार्यांचे बाण चुकवून विद्यमान आ. अशोक शिंदे शिवसेनेचा धनुष्य कसा पेलतात, याकडे हिंगणघाटवासीयांचे लक्ष लागून आहे.
सद्य:स्थितीत शिवसेनेचा गड मानला जात असलेल्या या क्षेत्रात नागरिकांनी राजू तिमांडे यांच्या रुपात २00४ मध्ये राष्ट्रवादीला संधी दिली होती. या संधीचे सोने मात्र त्यांना करता आले नाही. १९९५ आणि १९९९ च्या निवडणुकीत जनतेने डोक्यावर घेतलेले शिंदेचे नेतृत्व पुन्हा मान्य केले. १९९५ मध्ये राज्यात काँग्रेसविरोधी लाट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात, स्थानिक पातळीवरील सामाजिक अस्थिरता याचा पूर्ण लाभ अशोक शिंदे यांना मिळाला. यातच काँग्रेसचे सुनील राऊत, बसपाचे सिद्धार्थ पाटील आणि अपक्ष त्र्यंबकराव घोरपडे यांच्यात झालेले मतांचे विभाजनही सेनेच्या पथ्यावर पडले. १९९९ मध्ये राजू तिमांडे यांनी अपक्ष लढून काट्याची टक्कर दिली मात्र रिपाइंची मते विभागल्या गेली. याचाही फायदा शिवसेनेलाच मिळाला. २00४ मध्ये येथे परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसर्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले राजू तिमांडे यांनी ही जागा जिंकली. २00९ च्या निवडणुकीत अपक्षाच्या रुपाने समीर कुणावार नावाच्या वादळाने त्यांना चक्क तिसर्या स्थानावर फेकले. या निवडणुकीत शिंदे यांनी केवळ १६0१ इतक्या अल्प माताधिक्याने विजय नोंदविला.
शिंदे यांनी १५ वर्षे आमदारकी उपभोगली. मात्र त्यांच्या काळात एकही उल्लेखनीय काम न झाल्याचा लाभ उचलत मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी समांतर पातळीवर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये प्रत्यक्ष पक्ष बांधणी केली आहे. येत्या काही दिवसात हिंगणघाट क्षेत्रातील मुलभुत प्रश्नांना घेऊन ते मोठय़ा आंदोलनाच्या तयारीत आहे. तरुणांनाही जवळ केले आहे. मोदी लाटेमुळे आलबेल समजत असजलेल्या शिवसेनेच्या आनंदात मनसेच्या हालचाली विरजण टाकते की काय, अशी भिती सेनेच्या गोटात आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपला ६0 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यात समीर कुणावार यांचाही खारीचा वाटा आहे. २00९ च्या निवडणुकीत ४९ हजार ८६४ मते घेऊन राजकीय विशेलषकांना बुचकाळ्यात टाकणारे कुणावार आगामी निवडणुकीसाठीही सज्ज आहेत. आधीच राज्यात काँग्रेस-राकाँ आघाडीसाठी वातावरण अनुकुल नसताना कुणावार यांची उमेदवारी शिंदे यांच्यासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरणारी शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी राजू तिमांडे पूर्ण ताकदीनिशी तयारीत असले तरी पं.स. सभापती अँड. सुधीर कोठारी यांच्याही राकाँच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू आहे. पक्षश्रेष्ठी तिमांडेंना पुन्हा संधी देते वा अँड. कोठारींच्या रुपाने नवा चेहरा रिंगणात उतरविले, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
हिंगणघाटात युवा मतदारांची संख्या मोठी आहे. जनतेला विकासाची कास हवी आहे. धडपड नेतृत्वाची गरज आहे. या तीन गोष्टी जिकडे दिसेल तिकडे येथील जनता वळतील, असे एकंदर चित्र आहे. जातीच समीकरण विचारात घेतल्यास राजू तिमांडे, अतुल वांदिले हे तेली समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे आहेत, तर अशोक शिंदे हे कुणबी समाजातील आहेत. समीर कुणावार हे इतरमध्ये मोडतात. यावरुन तेली समाजातील मतांचे विभाजन अटळ असले तरी दलित समाजाची मते येथे निर्णायक ठरणारी आहेत.