मदन उन्नईचे पाणी रस्त्यावर

By Admin | Updated: December 25, 2015 02:59 IST2015-12-25T02:59:46+5:302015-12-25T02:59:46+5:30

मदन उन्नई धरणाच्या उजव्या कालव्याला कुठे तडा गेल्याने, कुठे गेट लिकेजमुळे तर काही ठिकाणी कालवा बुजल्याने पाणी वाट मिळेल तिकडे पळताना दिसते.

Madan uneven water on the road | मदन उन्नईचे पाणी रस्त्यावर

मदन उन्नईचे पाणी रस्त्यावर

सदोष कालव्यांचा प्रताप : शेती राहतेय कोरडी, पाण्याचा अवव्यय
आकोली : मदन उन्नई धरणाच्या उजव्या कालव्याला कुठे तडा गेल्याने, कुठे गेट लिकेजमुळे तर काही ठिकाणी कालवा बुजल्याने पाणी वाट मिळेल तिकडे पळताना दिसते. तीन दिवसांपासून तर कालव्याचे पाणी वर्धा-आर्वी रस्त्याचेच सिंचन करीत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
धरणामुळे शेतकरी समृद्ध होईल, कोरडवाहु शेतीला पाणी मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल हा शासनाचा हेतू आहे; पण पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नदी-नाले वाहत असताना शेती कोरडीच राहत असल्याचे दिसते. आकोली ते आंजी रोडवरील उत्तम पाटील यांच्या शेताजवळ मुख्य कालव्याला तडा गेल्याने अनेक ठिकाणावरून पाणी वाहत आहे. पाणी प्रवाहामुळे पाटील यांच्या शेतात तर नाला तयार आहे. कालव्यातून वाहुन जाणारे पाणी वाघाडी नदीत शिरत असल्याने नदीचा पाणी प्रवाह सुरू आहे.
सुकळी (बाई) नजीक गुलाब पजई यांच्या शेतातून गत तीन दिवसांपासून अहोरात्र पाणी वाहत आहे. सदर पाणी वर्धा ते आर्वी मार्गावर येऊन रस्त्याच्या बाजूने काढलेल्या नालीने धामनदीत जात असल्याचे दिसते. कालव्यातील लिकेजमुळे सर्वत्र पाणीच-पाणी दिसून येत आहे. एकीकडे सिंचनाकरिता पुरेसे पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. दुसरीकडे पाण्याचा बेसुमार अपव्यय होताना दिसत आहे; पण याची खंत ना शाखा अभियंत्याला आहे ना कालवा निरीक्षकाला. या प्रकारामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसते.(वार्ताहर)

शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
मदन उन्नई धरणाच्या सदोष कालव्यांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. शेतपिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून निर्माण करण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा सदोष कालव्यांमुळे केवळ अवव्यय होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्यात; पण निधी नसल्याचे कारण पूढे करून पाटबंधारे विभागाकडून दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे आहे.

पाटचऱ्या बुजल्या
मदन उन्नई धरणाचे केवळ कालवेच सदोष नाही तर पाटचऱ्यांचीही दुरवस्था झाली आहे. पाटचऱ्या गाळ व झुडपांनी बुजल्याने सर्व शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. हंगामापूर्वी या साफही केल्या जात नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो.

Web Title: Madan uneven water on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.