हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत नदीपात्राचे खोलीकरण करा
By Admin | Updated: April 21, 2016 02:30 IST2016-04-21T02:30:14+5:302016-04-21T02:30:14+5:30
‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण ....

हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत नदीपात्राचे खोलीकरण करा
माथा ते पायथा जलशिवार योजना : पाच गावातील गावकऱ्यांची शासनाकडे मागणी
कारंजा : ‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे. खोलीकरण झाल्यास ड्रायझोनमध्ये असलेल्या ठाणेगाव, चंदेवाणी, मदनी, सेलगाव, बिहाडी या पाच गावातील दुष्काळ मिटू शकतो. त्यामुळे माथा ते पायथा योजनेंतर्गत सदर गाव करावे अशी मागणी राज्य शासनाकडे या पाचही गावातील नागरिकांनी ठरावानिशी केली आहे.
कारंजा तालुक्यातील चंदेवाणी, मदनी, ठाणेगाव, सेलगाव (लवणे), बिहाडी ही गावे ड्रायझोनमध्ये असून येथे कायमस्वरूपी दुष्काळ असतो. पिण्याच्या पाण्यासोबतच गुराढोरांना चारा व पाणी हा प्रश्नही या गावांला तिव्रतेने जाणवतो. ही गावे उंचावर असल्यामुळे खैरी धरणाचे पाणी या गावांना मिळू शकत नाही. त्यामुळे या गावांचा विकास खोळंबला आहे. येथील पाणीपातळी खूप खोल गेली आहे. खडकाळ भूभाग असल्यामुळे विहिरींना पाणी लागत नाही.
हेटीकुंडी तलावापासून कार (खैरी) प्रकल्पापर्यंत अंदाजे नऊ कि़मी. परिसरात अंबा नदी वाहते. अर्ध्या हिवाळ्यापर्यंत या नदीला पाणी असते. पण नदीची रूंदी व खोली कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी बाजूच्या शेतात पसरून शेतीचे व पिकांचे नुकसान होत.
‘माथा ते पायथा जलशिवार योजनेंतर्गत’ या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास तसेच नदीपात्रात बॅरेजेस, लहान तलाव व बंधारे निर्माण केल्यास पाण्याची साठवणूक होवून पाचही गावांची पाणीसमस्या कायमस्वरूपी दूर होवू शकते.
तसेच या नदीतून जाणाऱ्या पांदण रस्त्यावर कोल्हापुरी बंधारे आणि उंच पूल बांधल्यास पाण्याचा साठा वाढून सभोवतालच्या विहिरींच्या पाण्याची पातळीहई वाढू शकते. त्यामुळे जून २०१६ पूर्वी हे काम शासनामार्फत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी शासनाला जवळपास ६ ते ७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण योजना राबविल्यास या पाच गावातील जलसमस्या कायमची संपेल, असे तज्ज्ञ जानकारांचे मत आहे.
योजनेचे महत्व व उपयोगीता लक्षात घेवून सेलगावचे सरपंच हनुमंत पठाडे, बिहाडीचे सरपंच कोकाटे, चंदेवाणीचे उपसरपंच अजय इंगळे, मदनीचे प्रदीप शेटे, बिहाडीचे विनोद धांदे, ठाणेगावचे सरपंच बोरकर, उपसरपंच साहेबराव पांडे, चंदेवाणीचे सरपंच कांबळे यांनी ग्रा.पं. स्तरावर ठराव घेवून लेखी निवेदन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले आहे.(तालुका प्रतिनिधी)