प्रेमीयुगलावंर वक्रदृष्टी

By Admin | Updated: June 26, 2015 02:06 IST2015-06-26T02:06:17+5:302015-06-26T02:06:17+5:30

बोर व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने अनेक प्रेमीयुगल जातात. त्यातील काही विचित्र अवस्थेतही बघायला मिळतात.

Lovers of Love | प्रेमीयुगलावंर वक्रदृष्टी

प्रेमीयुगलावंर वक्रदृष्टी

विनयभंग प्रकरण : बदनामीपोटी तक्रार होत नसल्याने फावले
वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने अनेक प्रेमीयुगल जातात. त्यातील काही विचित्र अवस्थेतही बघायला मिळतात. अशातच त्यांना हेरणाऱ्या टोळक्यांकडून मुलींची छेड काढणे व बलात्काराच्या घटना घडल्याचे बोलले जात होते. मात्र बदनामीपोटी कुणीही तक्रार करण्याची हिम्मत दाखवत नाही. घरी वाच्यता केली, तर घरची मंडळींकडून ‘तू तिथे कशाला गेलीस’, हा प्रश्न येतो. यामुळे झालेला अन्याय मुकाट्याने सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. याबाबतचे वृत्तही अनेकदा वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. याच अनुषंगाने या परिसरात पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी पुढे आली. पोलीस प्रशासनाने ही गंभीर बाब विचारात घेऊन गस्तही सुरू केली. मात्र कुंपणच शेत खात असेल, तर दाद कोणाकडे मागावी, हा प्रश्न उपस्थित झाला. एका सेवानिवृत्त पोलीस शिपायाचीच मुलगी या प्रकाराला बळी पडल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. त्या अनुषंगाने गस्तीवर जाण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक व चालकाचे पितळ उघड पडले. हा गोरखधंदा पहिल्यांदा नसून त्यांनी अनेक मुलींशी हे गैरकृत्य केले आहे. काही मुलींवर बलात्कार झाल्याच्या चर्चाही बोर परिसरात चवीने चर्चिल्या जात आहे. हे दोघे सर्वप्रथम असे जोडपे हेरुन त्यांच्या वाहनांचे प्लग काढत. नंतर त्यांचा भ्रमणध्वनी हिसकावत. नंतर एकजण मुलीला बयाण नोंदविण्याच्या नावावर एका झुडुपात घेऊन जात आणि तिच्याशी अश्लीलकृत्य करीत असत, दरम्यान, दुसरा तिच्या प्रियकराला बोलण्यात गुंतवून ठेवत असल्याची चर्चाही आहे. इतकेच नव्हे, तर अश्लील चित्रफीतही तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार सेलू ठाणेदाराला ज्ञात असल्याची माहिती काही पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. याच कारणाने त्यांच्यावर कारवाई कोण करणार, तक्रार केली तरी केवळ बदनामी होईल, या भीतीपोटी हा गोरखधंदा सुरुच होता. मात्र जेव्हा प्रकार घरातल्या मुलीशीच घडला. तिने हिमतीने तक्रार नोंदविली, तेव्हा हे बिंग फुटले. यामुळे इमाने-इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
‘त्या’ दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी
पोलीस अधीक्षकांनी आरोपी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक व चालकाचे निलंबन गुन्हा दाखल होताच करायला हवे होते. असो, उशिरा का होईना त्यांचे निलबंन केले. मात्र अन्य दोन कर्मचाऱ्यांचे केलेले निलंबन जबाबदार अधिकाऱ्यांच्या बचावासाठी करण्यात आल्याचा सूर पोलीस विभागातूनच ऐकायला मिळत आहे. या कारवाईवर पोलीस अधीक्षकांना तपास अधिकाऱ्यांकडून अंधारात ठेवले जात असल्याचेही बोलले जात आहे.
पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा
अंकित गोयल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्याकडून पोलीस प्रशासनात सूसुत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे एकंदर घडामोडींवरुन दिसून येते. त्यांनी अल्पावधीतच गावठी दारू तयार करून विकणाऱ्यांच्याविरुद्ध मोहीमच उघडली आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखविला. यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याकडून घडलेल्या या कृत्याबद्दल ते कमालीचे अस्वस्थ आहेत. ही बाब त्यांनी बोलूनही दाखविली. या प्रकरणाच्या खोलात जावून त्याचे कृत्य जनतेपुढे आणून पोलीस प्रशासन अशांवर सामान्यांसारखीच कारवाई करते, हे दाखवून द्यावे, अशी वर्धेकरांची मनोमन मागणी आहे.

Web Title: Lovers of Love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.