प्रेमासाठी जातीची बंधनं झुगारावीच लागतात
By Admin | Updated: February 14, 2016 01:57 IST2016-02-14T01:57:15+5:302016-02-14T01:57:15+5:30
माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्याचा हक्काचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. त्यामुळे आपल्या जीवनाचा जोडीदार म्हणून ज्याला निवडायचे आहे...

प्रेमासाठी जातीची बंधनं झुगारावीच लागतात
व्हॅलेंटाईन डे विशेष : जातीचे बंधन सैल होत असल्याचा अनुभव
पराग मगर वर्धा
माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्याचा हक्काचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. त्यामुळे आपल्या जीवनाचा जोडीदार म्हणून ज्याला निवडायचे आहे त्याला ते सांगण्यासाठी अनेक जण या दिवसाची वाट पाहात असतात. लव्ह अॅट फर्स्ट साईटसारख्या इन्स्टंट युगात आता हा टे्रंडही जुनाट होत चालला असला तरी प्रेमात सिरिअस असलेली व लग्न करून आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालवित असलेल्यांसाठी व्हॅलेंटाईन डे अनेक कारणांनी खास असतो. प्रेमविवाह म्हटलं की तो बरेचदा आंतरजातीय वा आंतरधर्मीय असतो. पूर्वेतिहास पाहाता अशा प्रकारे विवाह केलेल्यांपेकी काहींना समाजाचा, घरच्यांचा प्रचंड विरोध सहन करावा लागलेला असतो. तर काहींना कुठलाही विरोध होत नाही. पण लग्न केल्यावर ते निभावून नेणे यआतच खरी कसरत असते. ते ज्यांना साध्य झालं त्यांच्यासाठी हा व्हॅलेंटाईन डे खूप खास असतो. आंतरजातीय विवाह केलेली, तो व्यवस्थितपणे निभावून नेत असलेल्या जिल्ह्यातील काही जोडप्यांनी आपले मनोगत लोकमतशी व्यक्त केले. यावेळी ते सांगतात की आता प्रत्येकच दिवस हा असतो व्हॅलेंटाइन डे.
आमचा विवाह अजातीय होता - किशोर व सुनंदा वानखेडे
आंतरजातीय विवाह केल्यांपैकी एक असलेले प्रा. किशोर वानखेडे हे सुरुवातीलाच सांगतात की १९८२ साली झालेला आमचा विवाह हा आंतरजातीय नाही तर अजातीय होता. घरच्यांचा काहीसा विरोध होताच. त्यामुळे आम्ही दोघांनीच पत्रिका छापून ती घरच्यांना दिली. घरचे कुणीच आले नाही. आज मागे वळून पाहताना खूप आनंद होतो. आजही परिस्थिती काही ठिकाणी खूप बिकट आहे, विरोध होतच आहे.
जोडीदार नाही मित्र व्हा - माधुरी झाडे
जवळपास १६ वर्षांपूर्वी माधुरी झाडे यांचा आंतरजातीय विवाह हरिश पेटकर यांच्याशी झाला. दोघांच्याही घरून कसलाही विरोध नसला तरी नातेवाईकांकडून व्हायचा तो विरोध झालाच. मी निवडलेला जोडीदार माझासाठी बरोबर आहे, हे घरच्यांना समजावून सांगणही गरजेचं आहे.
जात डोक्यात असते - मुकेश व पूजा लुथडे
२००७ साली झालेल्या मुकेश व पूजा यांच्या विवाहालाही घरून खूप विरोध झाला नसला तरी काही दिवस मात्र समाजाची बोलणी खावीच लागली. आज हाच समाज तेवढाच आदर करीत असल्याचे मुकेश सांगतो. जात ही माणसाच्या डोक्यात असते. ती कधीही अंगाला चिकटलेली नसते. त्यामुळे ती डोक्यातून काढल्यास कुठलाही विरोध पत्कारण्याची ताकत मिळते.
संघर्ष दोघांचाच होता - राजदीप व सुरभी राठोर
दोन्ही समाज कर्मठ असतानाही कुठलाही विरोध न होता २०१२ साली अगदी पारंपरिक पद्धतीने आमचा आंतरजातीय विवाह झाला. खरा संघर्ष लग्नानंतर सुरू झाला. दोघेही शिकत असल्याने ही जबाबदारी सांभाळताना कित्येक दिवस एकमेकांपासून दूर राहावं लागलं. सुरभिच्या गावात काही दिवस त्यांना घरच्यांना बोलणी खावी लागली. आज हा विवाह गावात आदर्श प्रस्थापित करणारा झाला आहे.
पालकांनी समजदारी दाखविण्याची वेळ - सुरेश व चित्रा राहाटे
फारसा विरोध न होता १९८१ साली सुरेश व चित्रा राहाटे यांचा आंतरजातीय विवाह झाला. सुरेश यांच्या सासरकडून काहीसा विरोध झाला असला तरी चित्रा यांच्या सासरी मात्र त्यांना यथोचित सन्मान झाला. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने राहाटे सांगतात की आता खरं तर पालकांनी मुलांना समजून घेणेही खूप गरजेचे आहे. आपल्या मुलाला वा मुलीला योग्य जोडीदार मिळावा हिच इच्छा पालकांची असावी, मग तो इतर जाती व धर्मातला असेल तरी हरकत नाही.