खोदकामामुळे शेताचे नुकसान
By Admin | Updated: May 7, 2015 01:30 IST2015-05-07T01:30:55+5:302015-05-07T01:30:55+5:30
वायगाव (नि़) नजीकच्या मौजा नेरी शिवारात शिव पांदण रस्त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे़ या रस्त्याचे मोजमाप न करता बांधकाम करण्यात येत असल्याने ....

खोदकामामुळे शेताचे नुकसान
वर्धा : वायगाव (नि़) नजीकच्या मौजा नेरी शिवारात शिव पांदण रस्त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे़ या रस्त्याचे मोजमाप न करता बांधकाम करण्यात येत असल्याने शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. भेदभाव करीत धनिकांना झुकते माप देत गरीब शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान केले जात आहे. याबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे़ वरिष्ठांनी दखल घेत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़
मौजा नेरी शिवारात एका राजकीय पुढाऱ्याच्या नातलगाचे शेत आहे़ यामुळे त्या मार्गावर पांदण रस्त्याच्या बांधकामास सुरूवात झाली आहे. सदर रस्त्याच्या कडेला पाणी जाण्यासाठी बांध खोदला जात आहे. यात काही सधन तर काही कंत्राटदार व राजकीय पुढाऱ्याच्या नातेवाईकांनी शेताचे कुंपण अतिक्रमण करून रस्त्यावर आणले. हे कुंपण न काढता दुरून खोदकाम केले जात आहे तर दुसरीकडे पांदण खोदकामात जागा अपुरी पडत असल्याने गरीब शेतकऱ्याच्या शेतातून बांधाचे खोदकाम केले जात आहे. जेसीबीने सुरू असलेल्या या खोदकामास शेतकऱ्यांनी विरोध केला असता रात्रीच्या काळोखात खोदकामाचा सपाटा लावला आहे़ ही बाब शेतकऱ्याच्या निदर्शनात येताच त्यांनी तलाठी, तहसीलदार, जिल्हा परिषद वर्धा, उपविभागीय अधिकारी तसेच अल्लीपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली; पण अद्याप अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली नाही. शेतकऱ्यावरील हा अन्याय दूर करून शेताचे नुकसान थांबविण्याची मागणी होत आहे.
सधन शेतकऱ्यांना झुकते माप देत गरीब शेतकऱ्यांच्या शेतातून बांध खोदला जात असून शेताचे नुकसान होत आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)