‘सीसीआय’कडून कापूस उत्पादकांची लूट
By Admin | Updated: November 8, 2014 22:41 IST2014-11-08T22:41:26+5:302014-11-08T22:41:26+5:30
कापूस खरेदीची शासकीय यंत्रणा म्हणून शेतकरी सीसीआयकडे पाहत असताना केवळ कमी लांबीचा कापूस म्हणून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना

‘सीसीआय’कडून कापूस उत्पादकांची लूट
शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांचाच आधार
रूपेश खैरी - वर्धा
कापूस खरेदीची शासकीय यंत्रणा म्हणून शेतकरी सीसीआयकडे पाहत असताना केवळ कमी लांबीचा कापूस म्हणून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे अपेक्षित असताना त्यांच्याकडूनच लूट होत असल्याने आता कोणाकडे पहावे, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतातून घरी कापूस येणे सुरू झाले आहे. यंदा उत्पन्न कमी असल्याने आलेला कापूस बाजारात आणण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशात पनन महासंघाच्या खरेदीचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकणे सुरू केले आहे. शासकीय खरेदी सुरू झाली नसल्याने व्यापारी हमीभावाला किणार देत त्यांना वाटेल त्या दरात कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. व्यापारी ३६०० ते ३८०० रुपयांचा दर देत आहेत. या दरात शेतकऱ्यांना कापूस विकणे न परवडणारा आहे. अशात सीसीआयची खरेदी सुरू झाली. जिल्ह्यात आजघडीला देवळी व पुलगाव येथे कापूस खरेदी सुरू आहे. यात पुलगावात अद्याप शुभारंभही झाला नाही. तर देवळीत सीसीआयने ३ हजार ९५० रुपये क्विंटलच्या दराने ३२९ क्विंटल कापसाची खरेदी केली. हा दर हमीभावापेक्षा शंभर रुपयाने कमी आहे. सीसीआयची खरेदी शासकीय असल्याने शेतकऱ्यांना हमीभाव देणे गरजेचे असताना केवळ कमी लांबीच्या नावावर शेतकऱ्यांनी लूट होत असल्याचे समोर येत आहे.