कामकाजाच्या वेळातच कार्यालयाला कुलूप
By Admin | Updated: June 8, 2014 00:06 IST2014-06-08T00:06:08+5:302014-06-08T00:06:08+5:30
कार्यालयीन वेळेच्या आधीच येथील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाला कुलूप लावून कार्यालय बंद करण्याचा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला. त्यामुळे कार्यालय या दिवशी सुरू होते वा नाही, याबाबत शंका व्यक्त

कामकाजाच्या वेळातच कार्यालयाला कुलूप
घोराड : कार्यालयीन वेळेच्या आधीच येथील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाला कुलूप लावून कार्यालय बंद करण्याचा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला. त्यामुळे कार्यालय या दिवशी सुरू होते वा नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शनिवारीसुद्धा हे कार्यालय सकाळी ८.३0 पर्यंत उघडलेलेच नव्हते. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उत आला आहे.
सेलू येथील लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता कुलूपबंद होते. या चिकित्सालयाकडून जात असताना हा प्रकार दिसून आला. या कार्यालयाला कुलूप लावून असले तरी येथे लावलेल्या फलकावर फेब्रुवारी ते सप्टेंबर या महिन्यात सकाळी ७ ते १२ वाजतापर्यंत व सायंकाळी ४ ते ६ पर्यंत सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळ आहे तर या महिन्यादरम्यान येणार्या शनिवारी ७ ते १२ ची वेळ आहे. तसा फलक लागला आहे.
ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यात सकाळी ८ ते दुपारी १, विश्रांतीनंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशी वेळ असल्याचा फलक आहे. आता जून महिना सुरू आहे. सायंकाळी ६ वाजण्यापूर्वीच लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बंद दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र शासनांतर्गत येथे कार्यालय आहे. सेलू शहरातील पशू चिकित्सा येथे केली जाते. त्यासाठी शासनाने सुसज्ज इमारतही बांधली आहे. पण येथील परिस्थिती पाहता हे कार्यालय कधी वेळेत उघडले नाही व बंद झाले नाही, असेही परिसरातील नागरिकांकडून सांगितल्या जात आहे.
या कार्यालयात ३ प्रथमश्रेणी अधिकारी असल्याचे समजते. हे तिघेही मुख्यालयी राहत नाही. ५ वाजता हे कार्यालय बंद दिसल्यानंतर कार्यालय बंद करण्याची वेळ ६ वाजताची फलकावर दिसल्याने सदर प्रतिनिधी ६ वाजतापर्यंत कुणीतरी अधिकारी येईल याची प्रतीक्षा करीत थांबला. पण कुणीही ६ वाजून ५ मिनिटापर्यंत आले नाही. तर दुसर्या दिवशीही ८.३0 पर्यंत कुलूप बंदच होते.
या दिवशी अधिकारी कुठे गेले, कार्यालय कामकाजाच्या वेळात बंद का याबाबतची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे आवश्यक आहे. शासकीय अधिकारी वेळेचे भान न पाळत कामात हयगय करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे.(वार्ताहर)