थकीत कर्जदार शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारी
By Admin | Updated: May 14, 2014 02:12 IST2014-05-13T00:06:36+5:302014-05-14T02:12:55+5:30
निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर बँकांचे कर्ज थकित झाले आहे.

थकीत कर्जदार शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारी
सेलू : निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकर्यांवर बँकांचे कर्ज थकित झाले आहे. काही शेतकरी जुळवाजुळव करून थकित कर्ज अदा करीत आहेत तर नवीन कर्जासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत असल्याचे दिसते. बँकेतही शेतकर्यांची अडवणूक होत असल्याने यावर्षीही शेतकर्यांना कर्जासाठी सावकारांच्या दारीच जावे लागणार असल्याचे दिसते.
उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. शिक्षणाच्या खर्चातही वाढ झाली असून तो न झेपावणारा आहे. मेंदुत हुशार असताना आर्थिक विवंचनेमुळे शेतकर्यांच्या मुलांना इच्छा असून आवडीचे शिक्षण घेता येत नाही. मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव जड जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बँक डबघाईस आल्याने सहकारी सोसायटीतून मिळणारे पीककर्ज आता मिळत नाही. ज्या शोतकर्यांनी श्रमाचा पै-पै बँकेत जमा केला, तो पैसा बँक गरजेच्या वेळी देत नाही. असे असताना शेतकर्यांच्या प्रश्नांना बगल देत राजकीय मंडळी आपल्या पोळ्या शेकण्यात व्यस्त दिसतात. शेतकर्यांच्या शेतमालाचे भाव अचानक पडले. जो माल शेतकर्यांकडे नाही, जो व्यापार्याच्या गोदामात पोहोचला, त्याचे भाव वाढत आहेत. या विसंगतीमुळे शेतकरी हैराण झाला आहे.
सहकारी सोसायटी कर्ज देऊ शकत नाही. राष्ट्रीयकृत बँका सहजासहजी शेतकर्याला कर्ज देत नाही. दिलेच तर कागदपत्रे गोळा करताना त्याची दमछाक होते. शेतीचे भाव कितीही वाढले असले तरी त्या शेतीवर शेतकर्याला नाममात्र कर्ज मिळते. तेवढय़ा रकमेत वाढत्या दराचे बियाणे, खते, कीटकनाशके यांचा ताळमेळ बसत नाही. निंदण, खुरपणासाठी पैसा राहत नाही व शेतकर्यांना अपेक्षित उत्पन्नही होत नाही. त्यातही निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. यामुळे तो संकटात सापडला आहे. अशा स्थितीत नाईलाजाने शेतकर्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. सावकार शेतकर्यांच्या जमिनीचे सरळ विक्रीपत्र स्वत:च्या वा नातेवाईकांच्या नावे करून तुटपुंजी रक्कम शेतकर्यांच्या पदरात टाकते. अज्ञानी शेतकर्यांना सर्व कळत असताना हे लाचार कृत्य करतो. यात अनेक शेतकर्यांच्या जमिनी हडप करण्यात आल्या.
एकेकाळी सावकारांना सोलून काढण्याची भाषा करण्यात आली; पण येथे सावकारच शेतकर्यांना सोलून काढण्याची भाषा करीत असल्याचे दिसते. तालुक्यात कित्येक शेतकर्यांच्या उभ्या पिकाला भुईसपाट करून शेताचा ताबा सावकारांनी घेतला; पण त्यांच्यासमोर कुणाचे काहीच चालले नाही. ज्यांनी पोलीस ठाण्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना सावकारांनी शेताचे रजिस्टर्ड विक्रीपत्र दाखविले व चिरीमिरी देत अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्यायालयात जाण्याचे सल्ले देण्यात आले. एकट्या सेलू तालुक्यात सावकार विरोधी कायद्याचे पालन झाले व प्रायोगिक तत्वावर या तालुक्याची निवड करून सावकारांच्या ताब्यात गेलेल्या जम्मिनी परत करण्याची कारवाई निष्पक्षपणे सुरू झाली तर कित्येक लबाड चेहरे समोर येतील. शासन, प्रशासनाने या दृष्टीने कारवाई करावी, सावकारांचे शेतकर्यांच्या मानेभोवती आवळलेले पाश दूर सारण्यासाठी शेतकर्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)