१०० टक्के सिंचनाखाली असलेले लिंगापूर
By Admin | Updated: February 8, 2016 02:13 IST2016-02-08T02:13:04+5:302016-02-08T02:13:04+5:30
निसर्गाने परिपूर्ण सौंदर्य खुलविलेले लिंगापूर हे २८५ लोकवस्तीचे गाव. गावाच्या सभोवताल हिरवळीमुळे नंदनवनाचाच भास होतो.

१०० टक्के सिंचनाखाली असलेले लिंगापूर
चार फुटांवरच विहिरींना लागले पाणी : पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला
अमोल सोटे आष्टी (शहीद)
निसर्गाने परिपूर्ण सौंदर्य खुलविलेले लिंगापूर हे २८५ लोकवस्तीचे गाव. गावाच्या सभोवताल हिरवळीमुळे नंदनवनाचाच भास होतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या नाऱ्याचे पालन करणाऱ्या या गावाच्या मदतीला अप्पर वर्धा धरणही आले आहे. यामुळे येथील संपूर्ण जमीन सिंचनाखाली आली. सिंचनाची सवय असल्याने या गावातील नागरिक बारमाही पीक घेत असल्याचे सांगतात. गावात पाणी अडविण्यावर भर देण्यात आल्याने येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे.
आदिवासी बहुल असलेल्या लिंगापूर गावात रोजमजुरी करणारे नागरिक अधिक आहेत. येथील शेतीत गहू, चना, सोयाबीन यासह भाजीपालाही पिकविल्या जातो. येथे संत्र्याच्या बागाही आहेत. गावात असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे प्रदुषणाची समस्या गावात जाणवत नाही. सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबासाहेब कंगाले याच गावचे. राजकारणातही गाव मागे नाही. जिल्हा परिषद लहान आर्वी सर्कलचे सदस्य नंदकिशोर कंगाले याच गावचे. भाजपाचे तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर हे सुध्दा येथीलच. त्यामुळे गावात नेहमी वर्दळ पाहावयास मिळते. प्रत्येक शेतकऱ्याकडे हक्काची विहीर असावी म्हणून शासकीय योजनांमधून अनुदानावर सिंचन विहिरीचे बांधकाम केले आहे. हरिदास राऊत, गवळी यांच्या शेतात तर अवघ्या चार फुटावर पाणी लागले आहे. पहिल्या टप्प्यातील गव्हाचे पीक पूर्ण झाले असून पुन्हा गव्हाची पेरणी सुरू आहे. लिंगापूर-अंतोरा असा कमी वेळेत अंतर गाठणारा नवा रस्ताही मंजूर झाला आहे. गावासभोवताल असलेल्या जंगलाला वाचविण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्यावतीने गावकऱ्यांच्या मदतीने विशेष परिश्रम घेतले जाते.
शंभर टक्के सिंचनामुळे गाव तालुक्यासाठी आदर्श ठरणारे आहे. गावातील संपूर्ण रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले आहे. गावाच्या रस्त्यालगत दोन्ही बाजुने सामाजिक वनीकरण विभागाने मनरेगामधून वृक्षलागवड केल्याने हिरवीगार झाडे पाहायला मिळत आहे.
गावात अनेक घरे पक्की आहेत. टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावातील वाद तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सोडविल्या जाते. याकडे शासनाने आदर्श गाव म्हणून लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.