महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By Admin | Updated: January 2, 2016 08:35 IST2016-01-02T08:35:46+5:302016-01-02T08:35:46+5:30
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, डिमांड

महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
वर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, डिमांड भरूनही कृषिपंपाना वीज जोडणी नाही असे अनेक आरोप करीत महात्मा फुले समता परिषदेच्यातीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे दिले. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती देणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले.
निवेदनानुसार, जिल्ह्यात ५० पैसेपेक्षा कमी नजरअंदाज सुधारित पैसेवारी असल्यामुळे हा जिल्हा दुष्काळी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस पिकाच्या नुकसानी पोटी एकरी १० हजार रुपयांची मदत मिळावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शाळा कॉलेजची फी व एसटीची पास माफ करावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वाचे निकष लावून सरकारी नोकरी द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा दुष्काळी स्थितीतीत तत्काळ देण्यात यावी, अशा मागण्या या धरणे आंदोलन दरम्यान करण्यात आल्या. धरणे आंदोलनाचे शेवटी जिल्हाधिकारी यांना मुख्यामंत्र्यांना देण्यासाठी निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, विजय मुळे, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, अंबादास चौधरी, केशव तितरे, सुरेश सातोकर, अभय पुसदेकर, संजय म्हस्के, संजय भगत उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शासनकर्त्यांवर आरोप
४कापसाच्या भावाबद्दन विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करणारे आज सत्तेत असताना त्यांच्याकडूनही शेतमालाला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबद आकडेमोड करणारे देवेंद्र फडणवीस आता संपूर्ण कर्जमाफीबाबत नकार देत असल्याचा आरोप करीत त्यांचा येथे निषेध नोंदविण्यात आला. वर्धा जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी डिमांड भरून कृषी पंपाकरिता वीज जोडणी मागितली. ती अद्यापही मिळाली नाही.