लाखोंची मालमत्ता धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:48 IST2018-05-09T23:48:18+5:302018-05-09T23:48:18+5:30
‘जुने ते सोने’ असे म्हटल्या जात असले तरी जुन्या साहित्याकडे विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या दुर्लक्षित धोरणामुळे सध्या विविध शासकीय कार्यालयातील लाखोंची मालमत्ता असलेली चारचाकी वाहने धूळखात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

लाखोंची मालमत्ता धूळखात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘जुने ते सोने’ असे म्हटल्या जात असले तरी जुन्या साहित्याकडे विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या दुर्लक्षित धोरणामुळे सध्या विविध शासकीय कार्यालयातील लाखोंची मालमत्ता असलेली चारचाकी वाहने धूळखात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. परिणामी, त्या-त्या शासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुख्यांनी योग्य पावले उचलण्याची गरज आहे.
मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात काही चारचाकी वाहने धूळखात असल्याचे बघावयास मिळते. तर असाच काहीसा प्रकार उपवनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरातही बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे तर सिव्हील लाईन भागातील सिंचन भवन परिसरातही महाराष्ट्र शासन असे लिहून असलेले एक चारचाकी वाहन कचऱ्याच्या ढिगाºयावर उभे करण्यात आले आहे. शहरातील अनेक शासकीय कार्यालयात शासनाचा मोठा निधी खर्च करून वाहनतळाची निर्मिती करण्यात आली आहे. पाऊस व उन्हापासून सदर शासकीय मालमत्ता असलेल्या वाहनाचे संरक्षण व्हावे या हेतूने सदर वाहनतळ तयार करण्यात आले आहे; पण त्या वाहनतळावर सदर वाहने उभीच केली जात नाहीत. विविध शासकीय कार्यालयातील चालक आपल्या सवडीने व मनमर्जीने वाहनतळ वगळता कार्यालय परिसरात मिळेल त्या जागी वाहने उभी करण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येते. परिणामी, वरिष्ठांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
काहीच अधिकारी व लोकप्रतिनिधींची वाहने शेडमध्ये
जिल्हा परिषद कार्यालय परिसराचा फेरफटका मारला असता काही मोजक्याच लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची वाहने पार्कींग शेडमध्ये उभी केली जात असल्याचे दिसून आले. तर जास्तीत जास्त वाहने उन्हामध्ये उभी असल्याचे बघावयास मिळाले. नियोजित ठिकाणी वाहने उभी न करणे हा प्रकार चांगल्या वाहनांची दैना करण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची चर्चा सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सध्या होत आहे.