विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: October 28, 2014 23:01 IST2014-10-28T23:01:14+5:302014-10-28T23:01:14+5:30
गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्यासाठी धडपडत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना मात्र विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे.

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
वडनेर : गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्यासाठी धडपडत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना मात्र विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वीज वितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे डोळेझाक करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
या क्षेत्रात लाईनमनकडे काम अधिक व कर्मचारी कमी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कृषी पंपाच्या तक्रारीचे निरसन रितसर होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. एकाच दिवसातून अनेकदा वारंवार वीज खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारनियमनाच्या वेळा बरोबर नसल्याने कधी रात्री तर कधी दिवसा वीज पुरवठा खंडीत होतो. शेतकरी मात्र आपला जीव टांगणीला लावून रात्री अपरात्री ओलीतासाठी शेतावर जात असतात. अशात एखादी अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.
भारनियमन वाढत असल्याने खरीपात ओलीत करणे अवघड झाले आहे. आता रबी हंगाम सुरू होत आहे. यात भारनियमनाचा बडगा कायम असल्यास रबीला ओलीत कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रबी पिकांची ओलिताची सोय असून सुध्दा या विजेच्या लंपडावाने शेतकरी त्रस्त असल्याचे बोलत आहे. त्यामुळे यावर्षी रबी पिकांना ही फटका बसण्याचे संकेत आहेत. (वार्ताहर)