‘केज्या’चे असे झाले ‘संत केजाजी महाराज’

By Admin | Updated: February 8, 2016 02:21 IST2016-02-08T02:21:36+5:302016-02-08T02:21:36+5:30

महाराष्ट्रात बाराव्या शतकात संत चळवळीला सुरूवात झाली. बाराव्या शतकापासून संत ज्ञानेश्वराने भक्ती मार्गातून अध्यात्मिक व समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले.

'Kejya' happened to be 'Saint Kejaji Maharaj' | ‘केज्या’चे असे झाले ‘संत केजाजी महाराज’

‘केज्या’चे असे झाले ‘संत केजाजी महाराज’

विजय माहुरे घोराड
महाराष्ट्रात बाराव्या शतकात संत चळवळीला सुरूवात झाली. बाराव्या शतकापासून संत ज्ञानेश्वराने भक्ती मार्गातून अध्यात्मिक व समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. ते १६ व्या शतकापर्यंत तुकाराम महाराजांनी पूर्णत्वास नेल्याचे म्हटले आहे.
संत कृपा झाली। इमारत फळा आली। ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।।
जनार्दन एकनाथ। ध्वज उभारला भागवत। भजन करा सावकाश। तुका झालासे कळस।।
या भक्ती मार्गाचा वारसा महाराष्ट्रातील अनेक संतांनी पूढे नेला. त्यात विदर्भातील १८३ वर्षांपूर्वी उदयास आलेले अलौकिक पिता-पुत्र संत केजाजी व संत नामदेव महाराज होय. चंद्रपूर जिल्ह्यातील भांदक (भद्रावती) येथील कुटुंब नागपूर जिल्ह्यातील बेला येथे स्थायिक झाले आणि बेला या गावात १८४३ साली महाराजांचा जन्म झाला; पण त्यांचे कुटुंब त्यांच्या बालपणीच घोराड येथे आले अन् त्यांच्या पावन स्पर्शाने घोराड नगरी विदर्भाची पंढरी बनली.
केजाजी महाराजांचे वडील सखाबुवा, आई चंपाबाई भांदककर अतिशय गरिबीचे जीवन व्यतित करीत होते. अठराविश्वे दारिद्र्यामुळे गावातील वासुदेव पाटलाकडे शेतावर नोकरी करीत होते. बालपणी महाराजांना ‘केज्या’ म्हणून हाक मारीत. बालपणापासूनच केजाजी अध्यात्मवृत्तीचे होते. ते सदैव विठ्ठल नामाचा जप करीत परमेश्वर भक्तीत तल्लीन असायचे; पण प्रारंभी त्यांची महानता कुणालाही कळली नाही. पाटलाकडे केजाजी नोकरी करीत असताना सर्व नोकरांना काट्याचा फास रचण्यास सांगितला. सर्व नोकर काट्याचा फास रचण्यात गुंग होते तर केजाजी हरिनामात गुंग होते. इतरांचे काम पूर्ण होत असताना केज्याने काम केले नाही, म्हणून मालक रागावेल, असे महाराजांना सांगितले. असे म्हणताच महाराज हरिनामाचा जप करीत अनवाणी पायाने काट्याच्या फासावर चढून फास रचू लागले. इतर सर्व नोकरांनी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. ही चर्र्चा गावात व परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील सर्वांनी हा चमत्कार बघितला. तेव्हापासून केजाजी महाराजांचे संत रूप लोकांना कळले. त्यानंतर त्यांना कधीही काम सांगितले नाही तरी नियमित मजुरी व धान्य दिले जात होते.
केजाजी महाराजांची हळूहळू प्रसिद्धी होत गेल्याने राजे रघुजी भोसले महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा रघुजीराजे यांनी द्वारकेला जाण्यासाठी केजाजींना सोबत घेतले. महाराज पहाटे उठून नित्य प्रदक्षिणा करीत असताना रघुजी राजे द्वारकाधिशांचा अभिषेक करीत होते. केजाजी महाराज फक्त धोतर घालायचे, तेच अंगावर पांघरायचे. हा कुणी वेडा असेल, या अविर्भावाने द्वारपालांनी त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही.
अभिषेक सुरू असताना ब्राह्मण मंत्रोपचार करीत होते. श्लोेकाच्या विशिष्ट ठिकाणी महाराज हरी हरी विठ्ठल विठ्ठल मोठ्याने म्हणायचे; पण त्यांचकडे कुणीही लक्ष दिले नाही. ब्राह्मणांना मात्र श्लोक म्हणताना अवघड वाटत होते. त्याच रात्री द्वारकाधिश कृष्णरूपात ब्राह्मणांच्या स्वप्नात गेले व रघुजी राजांच्या ताट्यातील धोतर घातलेला विशिष्ट व्यक्तीच्या उपस्थितीत अभिषेक करण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी अशा व्यक्तीचा शोध घेण्यात आला तर ते धोतर घातलेले केजाजी महाराज होते. केजाजी महाराजांकडून अभिषेक करण्यात आला. महाराजांनी ब्राह्मणांची चुक लक्षात आणून दिली. केजाजींनी चुकलेले श्लोक म्हणून दाखविले. तेव्हापासून राजे रघुजी हे महाराजांचे निस्सीम भक्त झाले. केजाजी महाराज ज्ञान व अंतरज्ञानी होते, हे सिद्ध झाले.
संत केजाजी महाराज व संत गजानन महाराज समकालीन संत होते. हिंगणी या गावी भक्तांच्या भेटीला जात असताना संत गजानन महाराजांनी घोराडला भेट दिली, असे ग्रंथात नमूद आहे. अशा महान कर्मयोगी संताला आपल्या अंतिम वेळेची जाणीव होती.
आता हे मडके फुटणार, असे ते भक्तांना सांगत होते; पण त्याचा भावार्थ कुणालाही कळला नाही. १९०७ मध्ये ते आपले पुत्र संत नामदेव महाराज व काही भक्तांना घेऊन प्रयाग येथे गेले आणि तेथेच आपली शेवटची वारी करीत १४ जानेवारी १९०७ पौष वद्य पक्ष १० मकरसंक्रातीला आपला देह ठेवला. प्रयाग येथे केजाजी महाराजांची समाधी आहे. यामुळेच ‘जगाच्या कल्याणा, संतांची विभुती’, असे म्हटले जाते. सोमवारी (दि.८) संत केजाजी महाराज महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरतिर्थ घोराड येथील विठ्ठल-रूख्माई देवस्थानमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्र नामासह, समाधी पूजन, भजन तर लक्ष्मण महाराज गुडवार यांचे कीर्तन होत आहे.
पुण्यतिथी महोत्सव सुरू असून भक्तीमय वातावरण आहे. विद्युत रोषणाईसह तोरण, पतकांची बोरतिर्थ सजले आहे. १०९ वी पुण्यतिथी मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जात आहे.

Web Title: 'Kejya' happened to be 'Saint Kejaji Maharaj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.