मुख्य बाजारातील अतिक्रमण ‘हटाव’
By Admin | Updated: February 11, 2016 02:35 IST2016-02-11T02:35:15+5:302016-02-11T02:35:15+5:30
शहरातील मुख्य मार्गासह बाजारापेठेत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मुख्य बाजारातील अतिक्रमण ‘हटाव’
२५ हजारांचा दंड : रस्ते मोकळे होण्यास मदत, दिवसभर मात्र वाहतुकीस अडचण
वर्धा : शहरातील मुख्य मार्गासह बाजारापेठेत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून बजाज चौक ते आर्वी नाका तर बुधवारी मुख्य बाजारपेठेत ही मोहीम राबविण्यात आली. बुधवारी २५ ते २६ अतिक्रमणधारकांवर कारवाई करीत त्यांच्यावर २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
वर्धा शहरात मुख्य बाजारपेठेत व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यातच चारचाकी बंड्यांवर वस्तूंची विक्री करीत असलेल्यांमुळेही वाहतुकीचा पचका होतो. परिणामी मुख्य बाजारात कामानिमित्त व खरेदीसाठी येत असलेल्या नागरिकांची गैरसोय होते. हीच बाब ध्यानात घेत बुधवारी मुख्य बाजारात पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेल्या या कारवाईत जवळपास २५ अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. यात २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दिवसभर ही मोहीम सुरू होती. त्याचप्रमाणे मंगळवारी मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव कारवाईत एका अतिक्रमणधारकावर हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच मंगळवारी काही व्यापाऱ्यांनी पालिका कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याने बाजारपेठ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे बुधवारी कुठलाही वाद न होता अतिशय शांततेत ही मोहीम सुरू होती. परंतु वाहने रस्त्यावर दिवसभार उभी राहिल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.(शहर प्रतिनिधी)