जंगलाऐवजी परिसरातच सोडतात साप
By Admin | Updated: June 22, 2014 00:07 IST2014-06-22T00:07:45+5:302014-06-22T00:07:45+5:30
शहरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्रांद्वारे त्याला पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडल्या जावे अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असते; पण तसे न होता पकडलेले साप शहरातच इतरत्र सोडत

जंगलाऐवजी परिसरातच सोडतात साप
वर्धा : शहरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्रांद्वारे त्याला पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडल्या जावे अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असते; पण तसे न होता पकडलेले साप शहरातच इतरत्र सोडत असल्याचा प्रकार सेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावर आढळून आला. त्यामुळे याप्रकरणी सर्पमित्र गणेश चौधरीवर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे मंगेश गिरडे व परिसरातील नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना केली आहे.
निवेदनानुसार दोन दिवसांपूर्वी शिक्षा मंडळपरिसरात सेवाग्राम रेल्वेस्थानक मार्गावर रात्रीच्या वेळी मंगेश गिरडे जात असताना त्यांना एक इसम पकडलेला साप सोडताना आढळून आला. या प्रकाराबाबत त्याला हटकले असता त्याने सापाला लगेच पकडून तिथून पळ काढला. हा इसम सर्पमित्र गणेश चौधरी असल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे कुठेही साप सोडणे धोक्याचे आहे.
शहरात एखाद्या ठिकाणी साप आढळल्यास नागरिक सर्पमित्रांना पाचारण करतात सर्पमित्रानेच सापाला पकडून दूर जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या सापाला व नागरिकांना धोका होणार नाही. पकडलेले साप दुरवर न सोडता ते शिक्षा मंडळ परिसरात सोडल्या जात असल्याचा प्रकार आढळून आला. या प्रकारामुळे शिक्षा मंडळ परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. असा प्रकार याआधीही होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे साप सोडणाऱ्या सर्पमित्र गणेश चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षा मंडळ परिसरातील नागरिकांद्वार वनपरिक्षेत्र अधिकारी यांना करण्यात आली.
निनवदेन देणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश गिरडे, प्रशांत सातपुते, किरण बडवाईक, अशोक इंगळे, निलीमा जुगनाके, शुभांगी ढोरे, प्रफुल्ल दारोंडे, प्रशांत साबळे, नलिनी फरदे यांच्यासह परिसरातील नागरिकांचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)