संत्र्यावर अज्ञात रोगाचे सावट

By Admin | Updated: February 9, 2016 01:53 IST2016-02-09T01:53:49+5:302016-02-09T01:53:49+5:30

परिश्रम घेऊन उभ्या केलेल्या संत्रा बागांवर सध्या अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसते. संत्रा झाडे वाळत चालली आहे.

The infection of unknown disease on orange | संत्र्यावर अज्ञात रोगाचे सावट

संत्र्यावर अज्ञात रोगाचे सावट

झाडे वाळत असल्याने शेतकरी चिंतेत : शेतकऱ्यांना मदतीची मागणी
आष्टी (शहीद) : परिश्रम घेऊन उभ्या केलेल्या संत्रा बागांवर सध्या अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसते. संत्रा झाडे वाळत चालली आहे. सर्व उपाययोजना करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
मागील वर्षी अंबीया बहार मोठ्या प्रमाणात आल्याने कवडीमोल भावाने संत्रा विकावा लागला. यावर्षी मृग बहार दमदार असून भावही चांगले मिळण्याची शक्यता आहे; पण लहरी निसर्ग केव्हा कोपणार याचा भरवसा राहीला नाही. अचानक संत्रा बागा वाळत असल्याने हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. संत्रा झाडांची देखभाल करताना शेतकरी कुठलीही कसर ठेवत नाही. दरवर्षी छाट देऊन त्याला खत देणे, चुना व गुळाचे मिश्रण करून मारणे, खत घालणे, नियमित पाणी देणे एवढे करूनही संत्रा झाड वाळत आहेत. पाण्याची कमतरता असलेल्या गाव शिवारातील शेतकऱ्यांनी दूरवरून डोक्यावर पाणी आणून बागा जिवंत ठेवल्या आहेत; पण संत्राबागा एकाएकी वाळत असल्याचे दिसते. १०० झाडांमागे २५ झाडे वाळत आहेत. यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सूचवून मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. विहिरीच्या पाण्याची पाणी पातळी खालावत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विहिरीच्या पाण्यावर संत्राबागेचे सिंचन अवलंबून आहे. मृग बहाराची संत्री संगोपण करण्यासह वाळलेल्या झाडांना नष्ट करण्याचे कामही तालुक्यात सुरू आहे. माणिकवाडा, साहुर, तारासावंगा परिसरातील संत्रा बागा दव गेल्याने वाळत असल्याची माहिती साहूरच्या शेतकऱ्यांनी दिली. शासनाने सर्व्हे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही केली आहे. महसूल व कृषी विभागाने अद्यापही सर्वेक्षण मोहीम घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मदतीकरिता प्रतीक्षाच करावी लागत आहे.(प्रतिनिधी)

उपाययोजनाही ठरताहेत निकामी
बदलत्या वातावरणामुळे फळपिकांवर विविध रोगांचे आक्रमण होत आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा यांच्याकडून उपाययोजना सुचविण्यात आल्या; पण या ते उपाय करूनही परिसरातील अनेक बागायतदार शेतकऱ्यांच्या बागांतील संत्रा झाडे वाळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कृषी व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देणेच गरजेचे झाले आहे.

नियोजित बागांवरही फायटोप्थोरा रोग
संत्रा बागांचे नियोजन व आखणी तालुका कृषी विभागाकडून करण्यात आली होती; पण त्या बागांवरही फायटोप्थोरा रोग आला आहे. शिवाय वातावरणातील बदलामुळे बागा वाळत आहेत. यावर तालुका कृषी विभागाने संशोधन करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे; पण अद्यापही कृषी विभागाने लक्ष दिलेले नाही.

संत्रा फळबागा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी तालुका कृषी विभागाची आहे; पण हा विभाग अयोग्य नियोजन व दुर्लक्षित धोरण बागळून असल्याने त्याचा कुठलाही उपयोग झाला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. किमान आता संत्राबागा वाळत असताना तरी शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवाव्या व सर्वेक्षण करून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The infection of unknown disease on orange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.