नाला पुनर्भरणामुळे जलसाठ्यात वाढ
By Admin | Updated: May 20, 2015 02:21 IST2015-05-20T02:21:06+5:302015-05-20T02:21:06+5:30
पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने लाखो लिटर पाणी नदी, नाल्यांतून वाहून जाते.

नाला पुनर्भरणामुळे जलसाठ्यात वाढ
वर्धा : पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने लाखो लिटर पाणी नदी, नाल्यांतून वाहून जाते. पावसाळा संपताच शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. नदी, नाले गाळाने भरल्याने कोरड्या पडतात. काही नदी व नाल्याचे अस्तित्व संपले. अशाच एका नाल्याच्या उगम ते नदीला मिळेपर्यंतच्या पात्राचे सर्वेक्षण करून जलस्त्रोत्र पुनरूज्जीवनाचा यशस्वी प्रकल्प तामसवाडा येथे राबविण्यात आला. आठ किमी लांब नाल्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सुमारे अडीच लाख क्युबिक मिटर पाणी आहे. या नाला पुनर्भरण प्रकल्पामुळे सहा गावांतील विहिरी तुडूंब भरल्या आहे.
जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या आदिवासीबहुल तामसवाडा शिवारातून वाहणाऱ्या नाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरात हजारो एकर शेती खरडून जात होती. शिवाय गावात पाणी शिरत असल्याने घरांचेही मोठे नुकसान होत होते. यानंतर पावसाळा संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई होत होती. यामुळे जनावरांसह येथील कुटुंबांना स्थलांतर करावे लागत होते. ही वाताहत थांबविण्यासाठी उगम ते संगम या संकल्पनेतून नाला पुनर्भरणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पूर्ती सिंचन संस्थेसह ग्रामस्थांच्या सहकार्याने तामसवाडा नाल्याचे गाळविरहितीकरण, रूंदीकरण व विविध प्रकारचे माती बांध, दगडी, ग्याबियन, सिमेंट बांध आदी कामे जलसंधारणासाठीच्या विशेष निधीतून तसेच स्थानिक विकास योजनेतून घेण्यात आले आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्याने धाम नदीपर्यंतच्या बारा किमी लांबीच्या नाल्याचे खोलीकरण पूर्ण करण्यात आले. यात आठ किमीपर्यंत गाळ काढण्यासोबतच खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले.
उगम ते संगम या तत्वानुसार तामसावाडा येथील नाल्याचे ३५० मिटर लांबीपर्यंतचे २५ भाग करून प्रत्येक भागात पावसाचे पाणी अडवून साठविण्यात आले. शिरपूर पॅर्टननुसार बांधलेल्या या प्रकल्पामध्ये पाणी संथगतीने वाहणे, प्रत्येक भागात साठविणे सहज शक्य झाले आहे. यामुळे संगामाकडील भागात जलसाठा होता आणि पुनर्भरणही होते. शिवाय उगमाकडील भागात पुनर्भरण यशस्वीपणे शक्य होत आहे. या उपक्रमामुळे मागील दोन पावसाळ्यांत ७० हजार क्युसेक मिटर पाणी साठा झाला आहे. सुमारे ५ लाख क्युसेक मीटर पाणी भू-गर्भात मुरले. शिवाय सहा गावांतील ४५ ते ५० विहिरींच्या जलसाठ्यात पाच मिटरपर्यंत वाढ झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग दिशादर्शक ठरला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
नाला पुनर्भरणामुळे २४ तास पाणी पुरवठा झाला शक्य
‘गावचे पाणी गावाला’ याप्रमाणे तामसावाडा नाला पुनर्भरण प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असणाऱ्या सहा गावांना २४ तास पाणी पुरवठा होत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीला आज ४५ फुट पाणी उलपब्ध आहे. त्यासोबतच याच परिसरताील १०० एकर जमीन पूरमुक्त झाली आहे. शिवाय मे महिन्याच्या मध्यातही जलसाठा असल्यामुळे शेतकरी तिसरे उन्हाळी पीक घेत असल्याचे प्रकल्प अभियंता व जलतज्ज्ञ तसेच केंद्रीय बांधकाम पाणलोट व्यवस्थापन संचालन समितीचे माधव कोटस्थाने यांनी सांगितले.
तामसवाडा जंगलातून निघणाऱ्या या नाल्याच्या पहिल्या टप्प्यात १० हजार क्युबिक मिटर पाणी साठले आहे. पुढील तीन मिटरपर्यंत एक लाख क्युबिक मिटर जलसाठा झाला आहे. १२ किमी लांबीच्या बांधकामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह विदर्भ सदन सिंचन कार्यक्रम तसेच पूर्तीसिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी विशेष योगदान दिल्याचे माधव कोटस्थाने यांनी यावेळी सांगितले.
मृत नाल्याचे पुनरूज्जीवन
पाणी हे जीवन आहे. पावसाचे पाणी एकमेव स्त्रोत असल्यामुळे जलसंधारणाच्या या प्रयोगामध्ये मृत नाल्याचे पुनरूज्जीवन केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. नाल्याचे उथळ व अरूंद पात्र मोठे करणे, गाळविरहित नाला म्हणजेच वेगाने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वेग कमी करणे, पुरापासून संरक्षण करणे. त्यासोबतच जलसंवर्धन व भूजल स्त्रोताच्या पुनर्भरण प्रक्रियेला वेग देण्याचा तामसवाडा नाला पुनर्भरण प्रकल्पाचा उद्देश आहे. आठ किमी नाला खोलीकरण केल्यामुळे ३२ शेतकरी डिझेल पंपाच्या साह्याने तर ४० ते ४५ शेतकरी विहिरीवरील सिंचनाच्या माध्यमातून दुबार व तिबार पीक घेत आहे. याच नाल्यामध्ये अडीच लाख क्युबिक मिटर जलसाठा उपलब्ध आहे. नाल्याच्या खोलीकरणामुळे सुमारे ८ ते १० किमी रस्ता तयार झाला असून शेतकऱ्यांना शेतात जाणे सुलभ झाले आहे.
शेतात कापूस व सोयाबीन
अमीत गोमासे या शेतकऱ्याच्या शेतातील उन्हाळ्यात कापूस तसेच सोयाबीन पिकांना पाणी मिळाल्याने उत्पादनात वाढ झाली. सोबतच तीन एकरातील टरबूजाच्या शेतीपासून सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पादनही शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सिंचन वाढीसाठी सामूहिक प्रयत्न केल्याने भुईमूग हे तिसरे पीक घेणे शक्य झाले आहे.