पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटल्याने चिंतेत वाढ
By Admin | Updated: October 16, 2015 02:57 IST2015-10-16T02:57:13+5:302015-10-16T02:57:13+5:30
उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे.

पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटल्याने चिंतेत वाढ
उन्हाच्या तडाख्याने संकट : ओलिताकरिता पाणी सोडण्याची मागणी
पवनार : उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी तुरीच्या पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे ओलिताकरिता सिंचन विभागाने पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणी सोडण्याकरिता किमान २५ टक्के शेतकऱ्यांची मागणी असणे गरजेचे असल्याचे म्हणत सिंचन विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यास नकार देण्याचा सूर आवळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
महाकाळी धरणावरून धाम मुख्य कालवा असून सदर कालव्याद्वारे खरांगणा, आंजी येळाकेळी, पवनार, मांडगाव परिसरातील शेतकऱ्यांची सिचंनाची सोय होते. धरणसुद्धा १०० टक्के भरलेले असताना रब्बी हंगाम सुरू न झाल्याने कालव्याला पाणी सोडले जात नाही. कालव्याला कपाशी, तूर या पिकासाठी पाणी सोडले तर परिसरातील हजारो हेक्टर पिकाला त्याचा फायदा होईल. परंतु जलसिंचन विभाग मात्र शेतकऱ्यांवर कृपादृष्टी करायला तयार नसल्याचे निदर्शनात येते. मध्यंतरी पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक हातचे गेले. एकरी एक क्विंटलचा ही उतारा नसल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. त्याची भिस्त आता कपाशी, तूर या पिकावर आहे. उत्तरा नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच कपाशीचा पुरता श्रुंगार खाली आला होता व आता वाढत्या उन्हामुळे प्रचंड प्रमाणात पाती गळ होत आहे, तर जमिनीतील ओल आटल्यामुळे तुरीचीही पिकाचीही वाढ खुंटली आहे. अशावेळेस कालव्याद्वारे पाणी देणे गरजेचे आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविते, परंतु त्याला जे पाहिजे ते देत नाही ही वस्तुस्थिती आहे. कपाशी व तुरीकरिता पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.(वार्ताहर)