अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
By Admin | Updated: July 29, 2016 02:06 IST2016-07-29T02:06:15+5:302016-07-29T02:06:15+5:30
गत एक महिन्यापासून शहरवासीयांना अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे.

अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
कारंजावासीयांचे आरोग्य धोक्यात : नगरपंचायतीतून तुरटी बेपत्ता
कारंजा (घाडगे) : गत एक महिन्यापासून शहरवासीयांना अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारंजा शहर नगरपंचायत होवून बराच कालावधी झाला आहे. असे असताना या शहरात सुविधा वाढण्याऐवजी असुविधाच अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे.
कारंजा शहराला नियमीत व शुध्द पाणी पुरवठा व्हावा म्हणुन कारंजा ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच शिरीष भांगे यांच्या प्रयत्नाने त्यांच्या कार्यकाळात लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. नव्या टाक्या, नवीन पाईपलाईन टाकण्यात आली; मात्र याचा लाभ शहरवासीयांना होत नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या शुद्धतेकरिता आवश्यक असलेल्या तुरटीचा साठा गत कित्येक दिवसांपासून संपला आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराला होत असलेल्या अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यापासून नागरिकांची मुक्तता करावी अशी मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)
कारंजा शहरात सर्वत्र अशुध्द पाणी पुरवठा होत असला तरी प्रभाग क्रमांक ३ व ५ याला अपवाद ठरत आहे. या भागातील नागरिकांना शुध्द पाणी मिळत आहे. शहरात सर्वत्र अशुद्ध पाणी मिळत असून या भागातील नळाला शुध्द पाणी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारीही अवाक् झाले आहे.
शहरात काही प्रभागात शुद्ध आणि काही भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने मलाही आश्चर्य वाटत आहे. शुद्धीकरण केंद्राकरिता असलेला तुरटीचा साठा संपलेला आहे. त्यामुळे कदाचीत पाणी शुध्द येत नसेल. तुरटीचा साठा त्वरीत बोलाविण्यात येईल.
- विलास काचोरे, मुख्याधिकारी (प्रभारी), न.प. कारंजा(घा.)