मेघे भाजपवासी झाल्यास देवळीत चुरस
By Admin | Updated: June 11, 2014 00:12 IST2014-06-11T00:12:27+5:302014-06-11T00:12:27+5:30
देवळी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा अंमल असला तरी मेघे पिता-पुत्रांनी भाजप प्रवेश केल्यास या मतदार संघातील राजकीय समीकरण बदलाचे संकेत आहेत. भाजप सागर वा समीर यांना या क्षेत्रातून

मेघे भाजपवासी झाल्यास देवळीत चुरस
राजकीय घडामोडींना वेग : भाजपमध्ये दिग्गजांची उमेदवारीसाठी चढाओढ
राजेश भोजेकर - वर्धा
देवळी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा अंमल असला तरी मेघे पिता-पुत्रांनी भाजप प्रवेश केल्यास या मतदार संघातील राजकीय समीकरण बदलाचे संकेत आहेत. भाजप सागर वा समीर यांना या क्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरवून काँग्रेसपुढे कडवे आव्हान उभे करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
पूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती राव आणि आता ना. रणजित कांबळे यांच्या रुपाने काँग्रेसचा गड असलेला देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघ राजकीय घडामोडींनी एकाएकी चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय संपादन केल्यामुळे भाजपाच्या दिग्गजांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचाही या क्षेत्रावर डोळा आहे. खा. रामदास तडस हे तेली समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे असल्यामुळे विधानसभा कुणबी समाजाला मिळावी. असे झाल्यास तेली आणि कुणबी समाजाच्या मतांवर ही निवडणूक सहज जिंकता येणे शक्य आहे, असे डॉ. गोडे यांचे गणित आहे. माजी खासदार सुरेश वाघमारे यांना लोकसभा लढवायची होती. मात्र त्यांचा पत्ता कापून तडस यांनी तिकीट मिळवून बाजी मारल्यामुळे आता त्यांना दूरपर्यंत खासदारकीची संधी दिसत नाही. या कारणाने देवळीतून विधानसभा लढण्याच्या हालचाली वाघमारे यांनी सुरू केल्या आहेत. यासोबतच भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष राजेश बकाने आणि तालुकाध्यक्ष मुकेश भिसे हेही आपला दावा करीत आहेत. नेहमी प्रसिद्धीचा हव्यास बाळगून असलेले जि.प. सदस्य मिलिंद भेंडे यांनाही आमदारकीचे डोहाळे लागले आहेत.
काँग्रेसला रामराम ठोकत अनिवासी काँग्रेस झालेले जेष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे, पुत्र माजी आमदार सागर मेघे आणि समीर मेघे आगामी काळात भाजपवासी होणार आहेत. भाजपात बिनशर्त प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. असे झाल्यास देवळी विधानसभा क्षेत्रातून भाजप सागर वा समीर यांच्यापैकी एकाला निवडणूक रिंगणात उतरवून काँग्रेसपुढे नवे आव्हान उभे करण्याच्या तयारीत भाजप असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत रामदास तडस यांनी गुरु-पुत्राचा पराभव केला असला तरी मेघे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाने पुन्हा गुरु-शिष्याचे नाते घट्ट होण्याचे संकेत असून विधानसभा निवडणुकीत हे गुरु-शिष्य विजयासाठी कंबर कसणार, असाही सूर आहे. असे झाल्यास देवळीत चांगलीच चुरस बघायला मिळेल.
दत्ता मेघे बाहेर पडल्याने जिल्ह्यात काँग्रेसमध्ये ना. रणजित कांबळे यांना प्रतिस्पर्धी उरलेला नाही. तेच आता काँग्रेसचे सर्वेसर्वा असतील. काँग्रेसचा देवळी गड राखणे हे त्यांच्यापुढे पहिले आव्हान असेल. लोकसभा निवडणुकीत सागर मेघे यांच्या पराभवाचे खापर ना. रणजित कांबळे आणि आ. सुरेश देशमुख यांच्यावर फोडत भाजपच्या मार्गावर असलेले मेघे पिता-पुत्रांची देवळी आणि वर्धा दोन्ही विधानसभा मतदार संघात महत्त्वाची भूमिका असेल, ते आता जिल्ह्यातून काँग्रेसचा सफाया करण्याच्या बेतात असतील, असा राजकीय सूर असल्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदार संघात राजकीय घमासान बघायला मिळेल, असा अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीत देवळी विधानसभा मतदार संघातून भाजपला तब्बल ८१ हजार ८२२ मते मिळाली, तर काँग्रेसला ५१ हजार २९६ मतांवरच समाधान मानावे लागले. यात ३० हजार ५२६ चे भाजपला मताधिक्य मिळाले आहे. २००९ मध्ये विधानसभा क्षेत्रात २ लाख २५ हजार १२९ मतदार होते, आता ही संख्या २ लाख ४२ हजार ९१७ झाली असून यात १७ हजार ८७७ मतांची भर पडली आहे. यात नव मतदारांचा कल कोणाकडे राहतो, यावर विधानभेचे गणित अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत एकतर्फी मतदान झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहील, याबाबत मात्र साशंकता आहे.