पालकमंत्री पक्षांतर्गत असमन्वय कसा दूर करणार?

By Admin | Updated: January 13, 2015 23:03 IST2015-01-13T23:03:39+5:302015-01-13T23:03:39+5:30

राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्याने त्यांची नाड आता प्रत्यक्ष वर्धा जिल्ह्याशी जुडली आहे. येथील विकासकारण, समाजकारण आणि

How to remove unorganized parties within the guardian minister? | पालकमंत्री पक्षांतर्गत असमन्वय कसा दूर करणार?

पालकमंत्री पक्षांतर्गत असमन्वय कसा दूर करणार?

राजेश भोजेकर - वर्धा
राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्याने त्यांची नाड आता प्रत्यक्ष वर्धा जिल्ह्याशी जुडली आहे. येथील विकासकारण, समाजकारण आणि राजकारणही महत्त्वाचे ठरणार आहे़ त्यांच्या नावाची घोषणा होताच एक व्यक्तिमत्त्वाचे धनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, याचा मनस्वी आनंद वर्धेकरांना झाला. त्यांच्यातील संघटन कौशल्यही कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणार असेच आहे़ ते राज्याचे वित्त व नियोजन मंत्री असल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाला वाट मोकळी होईल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.
पालकमंत्री म्हणून ते काल-परवा पहिल्यांदाच वर्धेत येऊन गेले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतानाच त्यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना समन्वयातून विकासाला चालना देण्याचे ठणकावून सांगितले. ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ याप्रमाणे ते छाप पाडून गेले, ही चर्चा वर्धेकरांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे, ही बाब लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांपर्यंत मान्य करणारी आहे; परंतु लोकप्रतिनिधींना पक्षातील मंडळींचे पाठबळ नसेल आणि ते पक्षाचे पाठबळ घेण्याच्या मनस्थितीत नसतील, तर ते यात कितपत यशस्वी होतील, ही खरी गोम आहे. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पहिले पाऊल ठेवताच क्षणी त्यांना पक्षातील असमन्वयाचा प्रत्यय आल्याचे भाजपचीच काही मंडळी खासगीत सांगत आहे. ‘इम्प्रेस’ करण्यासाठी एकाच गावात त्यांचे दोनदा स्वागत झाले. पक्षाचा एक जबाबदार नेता म्हणून ही बाब त्यांना चांगलीच खटकल्याचीही आतील गोटातील माहिती आहे. त्या दिवशी जिल्ह्यात ना. मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भरगच्च कार्यक्रम पार पडले. दौऱ्यातील नियोजित प्रत्येक कार्यक्रमांना त्यांनी आवर्जून हजेरी लावली. यावेळीही त्यांना पक्षातील या असमन्वयाचे दर्शन घडले असेलच. याचे कारणही विचार करायला भाग पाडणारे असेच आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हापासूनच आपले अस्तित्व संपुष्टात येते की काय, अशी भीती भाजपच्या मंडळींना सतावित आहे. ही बाब काही मंडळी अप्रत्यक्षरीत्या व्यक्त करीत आली आहे. विधानसभा निवडणुकीत तर त्याचा वर्धेकरांना प्रत्ययच आला. वर्धा विधानसभा मतदार संघासाठी मेघे यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यासाठी उमेदवारीची मागणी झाली. त्यांचे राजकीय ज्येष्ठत्व लक्षात घेऊन भाजप श्रेष्ठींनीही त्यांचा सन्मान राखला. नेमकी हीच बाब भाजपच्या स्थानिक नेत्यांना खटकली. स्थानिक पातळीवर त्यांचे पक्षात मनापासून स्वागत झाल्याचे कधी जाणवले नाही. याचाच परिपाक वर्धेत बंडखोरीतून झाला. असंतुष्टांनी बंडखोर उमेदवाराचा झेंडा हातात घेऊन पक्षश्रेष्ठींच्या निर्णयालाच थेट आव्हान दिले. या निवडणुकीत भाजप पक्ष विखुरलेला जनतेने पहिल्यांदाच पाहिला.
कार्यकर्त्यांच्या या परस्परविरोधी लढाईतही पक्ष जिंकला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र हरल्यागत चित्र निर्माण झाले होते. यानंतरच्या काळात जनतेला नवे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते हे गुण्यागोविंदाने एकत्र आल्याचे कधीही दिसले नाहीत. ही मंडळी मनानेही कोसोदूर गेलेली आहे़ येथे चूक कोणाची? पक्षश्रेष्ठींनी ज्यांना उमेदवारी नाकारले त्यांची की तिकीट मिळविले त्यांची? हा गुंता दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. जिल्ह्यात पक्षाचा कुणी मोठा नेता आला की तो जनतेपुढेही येतो, हा प्रश्न स्थानिक पातळीवर सुटेल, याची आता शाश्वती वाटत नाही. समन्वय साधायचाच झाला, तर पुढाकार कोणी घ्यायचा, हा खरा प्रश्न आहे. उमेदवारी देतानाच समन्वय घडला असता तर कदाचित चित्र वेगळे असते, ही खंतही भाजपातील काही स्थानिक नेतेमंडळी खासगीत बोलून दाखवितात. वास्तविक, दत्ता मेघे भाजपवासी होण्यापूर्वी पक्ष एकसंघ होता का? ही बाबही पक्षश्रेष्ठींना विचार करायला लावणारी आहे. प्रत्येक जण एका मंचावर एकत्र येताना दिसत असले तरी मनाने ते किती जवळ आहेत, हा संशोधनाचा विषय होईल.
आजघडीला प्रत्येकजण स्वतंत्र भूमिकेत वावरताना दिसून येतो. स्वत:ची वेगळी ओळख दाखविण्यासाठी धडपडताना दिसून येतो. पालकमंत्र्यांच्या आगमनाबद्दल शहरात लागलेल्या स्वागताच्या फलकावरूनही ही बाब लपून राहिली नाही.
राज्यात आणि देशात भाजपाचेच सरकार असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार अधिकारी हा समन्वय ठेवून विकासाला चालना देतील आणि लोकप्रतिनिधी समन्वयातून आपली कामेही करवून घेतील; मात्र पक्षात वाढलेला हा असमन्वय दूर करण्याची किमया नवे पालकमंत्री आणि पक्षाचा जबाबदार नेता या नात्याने ते कशी साधतील, याकडेही वर्धेकरांचे लक्ष आहे़

Web Title: How to remove unorganized parties within the guardian minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.