अवघे गावच प्रतिबंधित शेतीची कामे करायची कशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:00+5:30
गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने शेतकरी, शेतमजुरांसह नागरिकही आता घरातच लॉकडाऊन झाले आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तुच्या सेवा या बाबी वगळता इतर कामाकरिता बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम पडला आहे.

अवघे गावच प्रतिबंधित शेतीची कामे करायची कशी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याच्या टोकावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या काकडा या गावात वेळोवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवार हिरवेगार झाले आहे. शेतात डोलणारी पिके पाहून शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या. मात्र, गावात एकामागून एक, दहा कोरोना रुग्ण आढळून आल्याने अवघे गावच प्रतिबंधित करण्यात आले. शेतकऱ्यांना घराबाहेर पडता येत नसल्याने शेतातील मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेतात सर्वत्र शांतता असून पिकेही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारंजा (घा.) तालुक्यातील काकडा गावात सुरुवातीला दोन रुग्ण आढळून आल्याने गावातील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला होता. पण, नंतर ही रुग्णसंख्या दहावर गेल्याने अवघे गावच प्रतिबंधीत करण्यात आले. गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने शेतकरी, शेतमजुरांसह नागरिकही आता घरातच लॉकडाऊन झाले आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तुच्या सेवा या बाबी वगळता इतर कामाकरिता बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम पडला आहे.
सध्या शेतीचा हंगाम असून शेतात डोलणाऱ्या पिकांची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकडे थोडेही दुर्लक्ष झाले तर वर्षभराचे उत्पन्न हातून जाण्याची भीती असते. पण, सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची निंदण, डवरण, फवारणी, खत देण्याची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी किंवा शेतमजूर शेताकडे फिरकत नसल्याने वन्यप्राण्यांपासूनही धोका निर्माण झाला असून शेतात पिकांच्यावर तण वाढत आहे. गावकऱ्यांना १४ दिवस घरातच राहावे लागले तर पिकांच्यावर तण वाढल्यानंतर शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागेल. त्याकरिता खर्चही वाढणार असल्याने शेतीची कामे करायची कशी, होणाऱ्या नुकसानीचे काय, अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी सध्या चिंतेत आहे. वेळीच योग्य कार्यवाहीची अपेक्षा येथील नागरिकांना आहे.
दुग्ध व्यवसायिकांना आर्थिक फटका
काकडा गावातील ३०८ घरांच्या वस्तीतील लोकसंख्या १ हजार ५०० च्या आसपास आहे. या गावातच आवागमनास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या गावामध्ये दुग्ध उत्पादकांची संख्या मोठी असून दररोज अडीचशे ते तिनशे लिटर दूध काढले जाते. मात्र, संचारबंदी असल्याने ते दूध नदीत फेकावे लागतात किं वा श्वानांना पाजावे लागत असल्याने दुग्धउत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. यासोबतच हजारावर जनावरांच्या चारापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
गावात कोरोना रुग्ण आढळून आल्याने गावच प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीकामे खोळंबली असून पिके धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. सोबतच जनावरांच्या वैरणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन गावकऱ्यांची या समस्यांतून सुटका करावी.
- वाल्मिक ठाकरे, उपसरपंच, काकडा.