रुग्णालय फुल्ल; गालफुगीच्या साथीने चिमुकले हैराण
By Admin | Updated: February 17, 2016 01:38 IST2016-02-17T01:38:47+5:302016-02-17T01:38:47+5:30
वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. सद्य:स्थितीत गालफुगी हा आजार बळावला असून

रुग्णालय फुल्ल; गालफुगीच्या साथीने चिमुकले हैराण
वर्धा : वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. सद्य:स्थितीत गालफुगी हा आजार बळावला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. प्रामुख्याने या विषाणंूची लागण लहान मुलांना अधिक प्रमाणात होत असल्याने बाह्य रूग्ण विभागात गत काही दिवसांपासून असे रूग्ण वाढत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने वेळीच उपाययोजना करून आजार पसरविण्यास प्रतिबंध करणे गरजेचे ठरत आहे.
गालफुगी या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला ताप येतो. यासह पोटदुखी, उलटी होणे, जेवण कमी होणे, अशी लक्षणे आढळतात. शून्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हा आजार आढळतो.
सध्या दमट वातावरण असल्याने विषाणूंच्या वाढ होत आहे. परिणामी विषाणूजन्य आजार बळावतात. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. त्यामुळे या काळात हे विषाणू फोफावत आहे. या आजारामुळे रुग्णाच्या जीवितास धोका नसतो. तरी शरीराच्या अपयांवर दुरगामी परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच उपचार करणे महत्त्चाचे ठरते. रुग्णाला वेळीच उपचार न मिळाल्यास विषाणूंचा प्रकोप वाढू शकतो. स्वादुपिंड, अंडाशय आणि मेंदुवर परिणाम होऊन भविष्यात व्याधी जडण्याचा धोका असतो. या आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. त्यामुळे आजारावर नियंत्रण मिळविता येते. हा संसर्गजन्य आजार असून श्वासावाटे अथवा थुंकीवाटे याचा प्रसार होतो. रुग्णाला सार्वजनिकस्थळी घेऊन जाणे टाळावे. चार पाच दिवस घरीच आराम केल्यास रुग्णाला आराम होतो.(रूथानिक प्रतिनिधी)
आजाराची लक्षणे
४गालफुगी हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराच्या विषाणुची लागण झाल्यावर रूग्णाला ताप येतो. कानाच्या मागे गाठ येते. पॅरॉटीड या ग्रंथीवर हे विषाणू परिणाम करतात. साधारणत: चार ते पाच दिवसांपर्यंत या आजाराचा प्रभाव असतो. विषाणूंचा प्रभाव वाढताच रूग्ण तापाने फणफणतो. पोटदुखी, उलट्या होतात. कानाजवळील गाठीची वाढ होऊन गालावर सुजन येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक उपाय
४रूग्णांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास सार्वजनिक स्थळी पाठवू नये. या आजाराचे प्रमाण मुख्यत्वे लहान मुलांमध्ये आढळत असल्याने चार-पाच दिवस मुलांना शाळेत पाठवू नये.
४वेळीच उपचार करून घ्यावेत. यामुळे रुग्णाला होणाऱ्या शारीरिक बाधांपासून बचाव करता येतो. संसर्गजन्य आजार असल्याने गर्दीच्या स्थळी जाणे टाळावे. यामुळे इतरांना आजाराची लागण होणार नाही. शिवाय या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असल्याने मुलांना शाळेत, शिकवणी वर्गाला न पाठवता घरीच आराम करू द्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.
वातावरण बदलाच्या काळात विषाणूजन्य आजार बळावतात. सध्या गालफुगी आजाराचे रुग्ण वाढत आहे. या काळात पालकांनी विशेष खबरदारी घेत मुलांना सार्वजनिक स्थळी घेवून जाणे टाळावे, तसेच आजारासंबंधी लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार करून घ्यावेत.
- डॉ. सचिन पावडे,
बालरोग तज्ज्ञ, वर्धा