समानाला समान तत्त्वावर आधारलेला होमिओपॅथीचा औषधोपचार
By Admin | Updated: April 10, 2016 02:24 IST2016-04-10T02:24:32+5:302016-04-10T02:24:32+5:30
एखाद्याला कुठला आजार झाल्यास तो बरा करण्यासाठी प्रतिरसायन देणारी अॅलोपॅथी ही उपचार पद्धती संपूर्ण जगात मान्यताप्राप्त आहे.

समानाला समान तत्त्वावर आधारलेला होमिओपॅथीचा औषधोपचार
जागतिक होमिओपॅथी दिन : रुग्णांचा कल वाढतोय
पराग मगर वर्धा
एखाद्याला कुठला आजार झाल्यास तो बरा करण्यासाठी प्रतिरसायन देणारी अॅलोपॅथी ही उपचार पद्धती संपूर्ण जगात मान्यताप्राप्त आहे. पण या उपचार पद्धतीला आव्हान देत डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी समानाला समान या तत्त्वावर आधारित होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा पद्धती नावारुपास आणली. आधुनिक विज्ञानाच्या कुठल्याही कसोटीवर उतरू न शकलेली ही चिकित्सा पद्धती मात्र आज संपूर्ण जगात मान्यताप्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या चिकित्सापद्धतीचा अवलंब करीत असलेल्यांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आपल्याकडे आजही ‘लोहा लोहे को काटता है’ अशी म्हण प्रचलित आहे. विशेष म्हणजे हे आजघडीला वास्तव आहे. याचाच तत्त्वत: प्रयोग हॅनमन यांनी त्यांच्या उपचार पद्धतीत करून ही उपचार पद्धती नावरुपास आणली. ज्याप्रमाणे सापाच्या विषापासून सर्पदंशावरील औषध बनते तशाच प्रकारचे तत्त्व त्यांनी या उपचारपद्धतीत वापरले. त्यांच्या म्हणण्यानुसार रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती ही मानवाच्या शरीरातच असते. त्यामुळे एखाद्या आजारावर औषध म्हणून होमिओपॅथीमध्ये प्रतिजैविके न देता आजाराच्या लक्षणाशी साधर्म्य असणारी जैवकेच अत्यल्प प्रमाणात रुग्णांना दिली जातात. ही जैवकेच शरीरातील व्याधी बरी करण्यासाठी शरीरालाच बाध्य करतात असे हे शास्त्र सांगते.
वैद्यकीयशास्त्रात त्यामुळे या पद्धतीला स्थान दिले जात नसले तरी १७९० पासून आजपर्यंत या उपचारपद्धतीत आमूलाग्र संशोधन होऊन ही समाजामध्ये सर्वमान्य झाली आहे. प्रस्थापित अॅलोपॅथीला आव्हान देत ही उपचार आज भारतातही मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. विशेष म्हणजे अॅलोपॅथीमध्ये बरे न होणारे अनेक असाध्य रोग या पद्धतीने बरे केल्याचा दावाही केला जात आहे.
ही पद्धती अतिशय संथपणे रुग्णांवर उपचार करते. अनेक वर्षांच्या संशोधनाअंती यात बरेच बदल झाले आहेत. जवळपास ४ हजार ५०० औषधी या उपचारपद्धतीत आज वापरली जात आहेत. व्यक्तीचा आजार बघून सुक्ष्म अध्ययनाद्वारे ईलाज केला जात असल्याने अचुक निदान केले जाते. विशेष म्हणजे यात कुठलाही दुष्परिणाम नाही. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करीत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
-डॉ. आनंद गाढवकर,
होमिओपॅथी तज्ज्ञ, वर्धा