जि.प.च्या शिक्षकाने बदलविला इतिहास
By Admin | Updated: January 11, 2015 23:02 IST2015-01-11T23:02:21+5:302015-01-11T23:02:21+5:30
आश्रमच्या शांती निकेतन परिसरात जिल्हा परिषदेचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्हा परिषदेच्यावतीने विविध सजावटी करण्यात आल्या आहेत.

जि.प.च्या शिक्षकाने बदलविला इतिहास
सेवाग्राम : आश्रमच्या शांती निकेतन परिसरात जिल्हा परिषदेचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्हा परिषदेच्यावतीने विविध सजावटी करण्यात आल्या आहेत. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांसह नागरिकांना थोर पुरूषांची माहिती व्हावी याकरिता काही छायाचित्र लावून त्यांची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली. हे काम जिल्हा परिषदेच्या कुण्या एका शिक्षकावर सोपविण्यात आले. या शिक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या नजर कैदेतून १९६६ मध्ये सुटका झाल्याचा जावई शोध लावला आहे. शिक्षकाच्या या जावई शोधामुळे स्पर्धेच्या ठिकाणी चांगलाच हशा पिकत आहे. वास्तविकतेत हे वर्ष १६६६ असे आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या विद्यार्थ्यांची ही स्पर्धा असून ती पाहण्याकरिता ग्रामीण भागातील त्यांचे पालक येत आहेत. यात बऱ्याच पालकांना माहिती जाणून घेण्याचा छंद असतो. यात जर त्यांच्या माहितीत ही चुकीची नोंद झाली तर त्याची जबाबदारी कोणाची अशी चर्चा काही पालक करताना दिसून आले आहे.
कार्यक्रमाच्या स्थळी योग्य माहिती देण्याची जबाबदारी ज्या शिक्षकावर होती त्या शिक्षकाने जर विद्यार्थ्यांना अशी चुकीची माहिती दिली तर विद्यार्थ्यांचे भवितव्यच अधांतरी येण्याची भीती आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.(वार्ताहर)