अवैध उत्खननामुळे टेकड्या, गढी होताहेत इतिहासजमा
By Admin | Updated: June 4, 2014 23:57 IST2014-06-04T23:57:35+5:302014-06-04T23:57:35+5:30
शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. ग्रामीण भागातही तुरळक प्रमाणात मातीच्या गढय़ा नजरेस पडतात.

अवैध उत्खननामुळे टेकड्या, गढी होताहेत इतिहासजमा
वर्धा : शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. ग्रामीण भागातही तुरळक प्रमाणात मातीच्या गढय़ा नजरेस पडतात. पण या टेकड्या आणि गढय़ा जेसीबीच्या सहाय्याने पोखरण्यात येत आहे. या सततच्या माती व मुरुमाच्या उत्खननामुळे येत्या काही वर्षात या टेकड्या इतिहासजमा होतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नैसर्गिक संसाधनावर मानवी वस्तीचे होत असलेले अतिक्रमन वाढतच आहे. कुठलाही परिसर हा सर्वत्र सपाट नसतो. कुठे तो उंचसखल तर कुठे मैदानी भाग असतो. यामुळे भूभागाचे संतुलन कायम रहाते. या उंच भागालाच आपण टेकड्या, जास्त उंच भागाला पर्वत तर केवळ मातीच्या उंच भागाला गढी असे संबोधले जाते. नैसर्गिकदृष्ट्या त्याची निर्मिती झाल्याने त्यामुळे निसर्गाचे संतुलन राखले जाते; परंतु मानवाचा शिरकाव जंगलांपर्यंत झाल्याने मानवी वस्तीबाहेर असलेल्या या टेकडी आणि गढी शहरात, गावांत दाखल झाली. त्यांच्याभोवताल वस्त्यांची संख्या वाढू लागली. घरांच्या बांधकामाकरिता या टेकड्यांना पोखरुन मुरूम आणि गढींमधील माती उपयोगात आणल्या जाऊ लागली. याचे प्रमाण वाढल्याने यावर निर्बंध लादण्यात आले. तसेच यामुळे संबंधित प्रशासनाला महसूलही मिळाला. हे उत्खनन मात्र या टेकड्यांच्या मुळावर उठले असून त्यामुळेही या टेकड्यांचे अतोनात दोहन होत आहे. परीणामी पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा टेकड्या आढळतात. त्यातील अनेक टेकड्यांवर सध्या अशाच प्रकारे अवैध उत्खनन होत असल्याचे दिसते. टेकड्यांपासून मिळत असलेल्या मुरुमाचा उपयोग घराच्या बांधकामात जोत्यात भराईसाठी केला जातो. याप्रकारच्या अवैध उत्खननातून मोठ्या प्रमाणात मुरुम मिळत असल्याने दिवसेंदिवस शहराबाहेरील टेकड्या पोखरण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु संबंधित प्रशासनाला याची माहिती नसल्यागत कारवाई शून्य असून टेकड्या पोखरल्या जात आहेत. (शहर प्रतिनिधी)
निसर्गाचेही दोहन
टेकड्या व गढय़ांच्या निर्मितीची प्रक्रिया ही नैसर्गिकरित्या होत असते. त्यामुळे निसर्गाचे संतुलन कायम राहते. गावांतील गढय़ादेखील नद्यांच्या आसपास आढळतात. त्यामुळे गावात नदीच्या पुराचे पाणी शिरत नाही
दिवसेंदिवस या गढय़ांचे दोहन होत असल्याने पूराला अटकाव करणारी ही नैसर्गिक यंत्रणाच नेस्तनाबूत झाली आहे. याचा परिणामही काही काळात ग्रामीण भागातील नागरिक सोसत आहे.
टेकड्यांमुळे भूजल पातळी कायम राहते. अवैध उत्खननाने भूजल पातळी खालावत आहे.