उड्डाण पुलावर पादचारी मार्ग खचला
By Admin | Updated: January 11, 2016 01:59 IST2016-01-11T01:59:19+5:302016-01-11T01:59:19+5:30
वर्धा ते सेवाग्राम दरम्यान असलेल्या इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील पादचारी मार्गाला भेगा व खड्डे पडले आहेत.

उड्डाण पुलावर पादचारी मार्ग खचला
मॉर्निंग वॉक धोक्यात : बांधकाम विभागाने दुरूस्ती करणे गरजेचे
सेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम दरम्यान असलेल्या इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील पादचारी मार्गाला भेगा व खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत पादचारी मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
सेवाग्राम ते वर्धा मार्गावर उड्डाण पूल आहे. या पुलावरूनच एक मार्ग बरबडी व पूढे गोजीकडे गेलेला आहे. या मार्गावर रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. शिवाय सर्व प्रकारची वाहने सारखी धावत असतात. आपले आरोग्य सुदृढ राहावे म्हणून अनेक महिला, पुरूष पहाटे व सायंकाळी सेवाग्राम, बरबडी मार्गाकडे फिरायला जातात. सर्वांनाच पुलावरून जावे लागत असल्याने पादचारी मार्गाचा वापर होतो; पण दोन्ही बाजूचा पादचारी मार्ग मोठ्या प्रमाणात फुटल्याने धोका निर्माण झाला आहे. रात्री वाहनांच्या प्रकाशामुळे खड्डा दिसत नाही. परिणामी, पाय अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
वर्धा शहरातील इंदिरा गांधी आणि आचार्य विनोबा भावे हे दोन्ही उड्डाण पूल रेल्वे लाईन असल्यामुळे बांधण्यात आलेले आहेत. गत कित्येक वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या पुलांवरील रस्त्यांची केवळ डागडुजी होते; पण त्यातील पादचारी मार्गांची दुरूस्ती केली जात नाही. यामुळेच इंदिरा उड्डाण पुलावरील पादचारी मार्ग अनेक ठिकाणी खचला असल्याचे दिसून येते. या पुलावरून सेवाग्राम तसेच बरबडीकडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करावी लागते. शिवाय त्या परिसरातील नागरिक या पुलावर सकाळी तसेच सायंकाळी फिरायला येतात. या नागरिकांना खचलेला भाग न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
काही दिवसांपूर्वी उड्डाण पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली; पण पादचारी मार्गाच्या दुरूस्तीकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी, अपघाताचा धोका कायम आहे. रात्रीला काही युवक पुलावर गप्पा करतानाही दिसतात. अनावधानाने मोठे संकट येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)