किरणोत्सर्गामुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: July 13, 2015 02:11 IST2015-07-13T02:11:32+5:302015-07-13T02:11:32+5:30
स्थानिक पुखराज कोचर वॉर्डातील रहिवासी परिसरात असलेल्या मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या किरणोत्सरी

किरणोत्सर्गामुळे आरोग्य धोक्यात
जिल्हाधिकारी यांना निवेदन : मोबाईल टॉवर स्थलांतरित करण्याची मागणी
हिंगणघाट : स्थानिक पुखराज कोचर वॉर्डातील रहिवासी परिसरात असलेल्या मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या किरणोत्सरी उच्च लहरीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सदर टॉवर स्थलांतरित करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील कोचर वॉर्डात २००२ साली रिलायन्स कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र नगर पालिकेच्या वतीने देण्यात आले. परंतु परिसरातील नागरिकांचे त्यासाठी संमतीपत्र घेण्यात आले नसल्याचे निवेदनात नमूद आहे. सुरूवातीला या टॉवरची क्षमता कमी होती.
आता या टॉवरची क्षमता ३०० मीटर झाली असून त्यातून निघाऱ्या किरणोत्सरी उच्च लहरीमुळे हा परिसरत प्रभावित होत असल्याचे नागरिक सांगत आहे. हा परिसर रहिवासी नागरिकांची वस्ती असलेला परिसर आहे. त्यातच मोबाईल टॉवरची क्षमता वाढल्याने परिसरातील रहिवाश्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार परिसरातील नागरिक करीत आहे.
मोबाईल टॉवरमधून निघाणाऱ्या उच्च लहरी मायक्रोवेव्ह ओव्हन या प्रकारातील असतात. या लहरींचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. परिणामी अर्धांगवायूचा झटका येणे, डोकेदुखी, चक्कर, झोप न लागणे, यांसारखे विकार जडण्याचा धोका असतो. लहान मुलांवरही याचा थेट परिणाम होतो. सुरूवातीला या टॉवरची क्षमता कमी असल्याने नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु अलीकडे ही क्षमता वढविल्याने सदर टॉवरच येथून हटवावे अशी मागणी कोचर वॉर्डातील अनेक नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात दूरसंचार मंत्रालय, नवी दिल्ली, आरोग्य मंत्रालय, मुंबई आणि उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना यापूर्वीच निवेदन दिले होते. तरीही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे टॉवरला स्थलांतरित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात विजय येनपुतवार, गजानन ढुमे, प्रशांत पापटीवार, अब्बास अली अजानी, सुरेश मुंजेवार, भाविक सांगानी, पांडूरंग गलांडे, नरेंद्र चाफले, पुंडलिक हुलके, राकेश शर्मा, विजय भांडवलकर, राजू चौधरी, सचिन धुमकेतू, अशोक देवगीरकर, अनिल महाजन, आशिष हाते, विनोद दाऊ, संतोष खाडे, अशोक जयस्वाल, यासह ५१ नागरिकांचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)
टॉवर उभारतेवेळी अधिसूचना अस्तित्वात नव्हती
हिंगणघाट नगरपालिका क्षेत्रातील विविध कंपन्यांची एकूण १७ मोबाईल टॉवर असून काही मोबाईल टॉवर तर शहराच्या मध्यवस्तीत आहेत. टॉवर उभारण्यासाठी, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दि. ५ मार्च २०१४ अन्वये नाहरकत देण्यापूर्वी संबंधित परिसरातील नागरिकांची समंती आवश्यक असते.
कोचर वॉर्डातील सदर टॉवरला उभारणीकरिता न.प. कार्यालयाकडून ०३ आॅगस्ट २००२ ला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यावेळी ती अधिसूचना अस्तित्वात नव्हती. ती अधिसूचना ४ मार्च २०१४ नंतर अंमलात आली. त्यामुळे तेथील नागरिकांची सम्मती घेण्यात आली नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
४ मार्च २०१४ नंतर कोणालाही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. मोबाईल टॉवरकरिता मागील ५ वर्षात १७ मोबाईल टॉवर कडून करापोटी पालिकेला १७ लाख ५० रू. चे उत्पन्न मिळाले होते. नगरपालिका आणि टॉवर कंपनीशी कोणताही करारनामा नसून फक्त नाहरकत प्रमाणपत्र दिल्या गेल्याचेही माहिती अधिकारात उघड झाल्याचे नागरिकांनी सांगितले.