चार उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकांची पदे रिक्तच
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:37+5:302016-04-03T03:51:37+5:30
नागरिकांना चांगली व तात्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे.

चार उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकांची पदे रिक्तच
सालई (कला) प्राथमिक आरोग्य केंद्र : तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही कमतरता
सेलू : नागरिकांना चांगली व तात्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. असे असले तरी जंगलव्याप्त भागातील सालई (कला) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चार उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकाच नाही. शिवाय दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना एकाच अधिकाऱ्याला केंद्राचा भार सांभाळावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हाडा अंतर्गत येत असलेल्या सालई (कला) प्राथमिक केंद्रात एलएचव्ही, आरोग्य सेविका, स्विपर आदी पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहे. याबाबत पंचायत समिती सदस्याने अनेकदा वरिष्ठांना निवेदन देऊन लक्ष वेधले. असे असले तरी अद्याप ही रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. यामुळे खरोखर या भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळत असेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सेलू तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय, पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, २७ उपकेंद्र, दोन आयुर्वेदिक आणि दोन अॅलोपॅथिक दवाखाने आहेत. या प्रपंचातून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. १ एप्रिल १९८४ रोजी तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. यात झडशी व दहेगावचा समावेश आहे. १ एप्रिल १९९० रोजी सिंदी (रेल्वे) येथे निर्मिती तर सेलू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सालई (कला) येथे हलविण्यात आले. २६ जानेवारी १९९० रोजी जंगलव्याप्त भागात हे आरोग्य केंद्र सुरू झाले. सेलू येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. ११ जून २००० रोजी हमदापूर येथे पाचवे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले.
पाचपैकी चार आरोग्य केंद्रात कर्मचारी व अधिकारी आहे; पण सालई (कला) प्राथ. आरोग्य केंद्रात चार आरोग्य सेविका, एक वैद्यकीय अधिकारी आहे. सालई (पेवट) येथील आयुर्वेदिक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी काही महिन्यांपासून दहेगाव (गो.) येथील पदभार सांभाळत आहे. यामुळे जंगलव्याप्त भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. नवरगाव, बोरी, गरमसूर व सालई (कला) येथील उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. गरमसूर येथील रुग्णांना कारंजा व नागपूर येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)