लाईनमनला मुख्यालयाची अॅलर्जी
By Admin | Updated: September 16, 2014 23:57 IST2014-09-16T23:57:03+5:302014-09-16T23:57:03+5:30
येथील महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना वा शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईनमनला मुख्यालयाची अॅलर्जी झाली का,

लाईनमनला मुख्यालयाची अॅलर्जी
झडशी : येथील महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना वा शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईनमनला मुख्यालयाची अॅलर्जी झाली का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने गावातील रोहित्रावरून वीजपुरवठा खंडित झाला की गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढण्याशिवाय पर्याय राहत नाही. इतकेच नव्हे तर उमरगाव परिसरातील गेल्या कित्येक महिन्यांपासून रोहित्रावरून शेतातील एकच फेज वारंवार बंद पडतो. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्याला दुरूस्तीला वेळच मिळत नाही. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी वा गावातील नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाईनमनशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता ग्राहकांचे कुठलेही उत्तर मिळत नाही.
पाऊस सुरू असताना वा इतर कोणत्याही परिस्थितीचा अडचण भासणार नाही यासाठी वीज दुरूस्ती करताना सर्व व्यवस्था वा साधने महावितरणने कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्यांना समस्येबद्दल सांगितले असता अनेक कारणे सांगून सध्या काम होऊ शकणार नाही अशी कारणे दिली जातात. पावसाळ्यात याचा त्रास नागरिकांना प्रकर्षाने जाणवतो. सतंतधार पाऊस सुरू असला तर संपूर्ण गावाला पाऊस थांबेपर्यंत अंधारात राहावे लागत असल्याची स्थिती असते. उडवाउडवीची उत्तरे महावितरणचे कर्मचारी नेहमीच देत असल्याचे गावकरी सांगतात.
गावातील नागरिकांच्या वा शेतकऱ्यांच्या वीज दुरूस्तीच्या काही समस्या असल्या तर त्यावर संबंधित कर्मचाऱ्याकडून त्वरीत कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना वा ग्राहकांना आपल्या वीज दुरूस्ती संबंधी समस्या त्वरीत दुरूस्त करायची असली तर तालुका अभियंता वा उपअभियंता यांना संपर्क करावा लागतो. नंतरच ग्राहकांच्या, शेतकऱ्याच्या तक्रारीवर अंमलबजावणी केली जाते. अन्यथा खाजगी कारागीराकडून दुरूस्ती करून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. किंवा लाईनमनला सतत विनवणी करावी लागते. रात्रीला महावितरणचा एक कर्मचारी (लाईनमन) गावात राहावा अशी गावातील नागरिकांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करून गावात महावितरणच्या एक लाईनमनला तरी मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.(वार्ताहर)