‘तो’ पूल देतो अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:11+5:30
नदीकाठी राहणाऱ्या कुटुंबांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो. अनेक कुटुंबांना सर्व साहित्य घेऊन इतरत्र जावे लागते. याच नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा लहान खोलगट पुलाचे काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यात आले होते. मात्र, थोडाही पाऊस आला की धरण फुल्ल होत नदीला पूर येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
झडशी : येथून जवळ असलेल्या डोंगरगाव हे नानबर्डी गटग्रामपंचायतीअंतर्गत येते. या दोन गावांच्या मधून जाणाऱ्या नदीवर पाटबंधारे विभागामार्फत पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जंगलाच्या मध्यभागात धरणाचे निर्माण करण्यात आले; मात्र या धरणाचा सांडवा याच नदीवर काढण्यात आला. अत्यल्प पावसातच हे धरण भरते. पावसाचा जोर वाढला की या नदीकाठच्या घरांना धोका उद्भवतो.
यामुळे नदीकाठी राहणाऱ्या कुटुंबांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो. अनेक कुटुंबांना सर्व साहित्य घेऊन इतरत्र जावे लागते. याच नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा लहान खोलगट पुलाचे काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यात आले होते. मात्र, थोडाही पाऊस आला की धरण फुल्ल होत नदीला पूर येतो. पावसाळ्यात पुलावरील वाहतूक कित्येक दिवस ठप्प असते. या दरम्यान एखादा रुग्ण अथवा गरोदर महिलेला उपचाराकरिता कसे न्यायचे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडतो. इतर गावांशी संपर्क तुटतो. धरणाचे पाणी गावात मोठ्या प्रमाणावर शिरते. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची उंची वाढविली जात नाही. लोकप्रतिनिधींकडूनही याविषयी प्रयत्न होत नाहीत. लहान खोलगट पूल उंच करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.