गारपिटीचा तडाखा कायम
By Admin | Updated: March 2, 2016 02:32 IST2016-03-02T02:32:48+5:302016-03-02T02:32:48+5:30
गत दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला आहे. रविवारी व सोमवारी रात्री तालुक्यात गारपिटीने थैमान घातले.

गारपिटीचा तडाखा कायम
अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान
देवळी : गत दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला आहे. रविवारी व सोमवारी रात्री तालुक्यात गारपिटीने थैमान घातले. या गारपिटीचा तडाखा बहुतांश गावांना बसला. यात गहू, हरभरा, संत्रा तसेच बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांचा मार झाल्याने शेतात उभा असलेला गहू, लोळला. चन्याच्या गंजीवरील ताडपत्र्या उडाल्याने तोही ओला झाला.
तालुक्यातील नागझरी, बेलगाव व मुरदगाव येथील सुमारे २० एकरातील संत्रा पिकाचे नुकसान झाले. तालुक्यातील बहुतांश गावाची हीच परिस्थिती असल्याने पीक हाती येण्याच्या ऐन उमेदीच्या काळात नुकसान झाल्याने कास्तकार हताश झाला आहे. तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांच्या निर्देशानुसार पटवारी व तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने पाहणी करण्यात आली आहे. या सर्व्हेत ३३ टक्क्याच्या आत गहू ५५० हेक्टर, हरभरा १६३ हेक्टर, संत्रा ११ हेक्टर, भाजीपाला १३ हेक्टरवर नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले तर ३३ टक्यावर झालेल्या नुकसानीत गहू ११० हेक्टर, हरभरा ३१ हेक्टर, तर सहा हेक्टरवर संत्रा पिकांचे नुकसान झाले.