पीक प्रात्यक्षिक उपक्रमाद्वारे शेतपिकांवर मार्गदर्शन
By Admin | Updated: February 20, 2016 03:03 IST2016-02-20T03:03:22+5:302016-02-20T03:03:22+5:30
भारतीय कृषी अनुसंधान परिषद हैदराबाद आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यावतीने कृषी विज्ञान केंद्र,...

पीक प्रात्यक्षिक उपक्रमाद्वारे शेतपिकांवर मार्गदर्शन
खत व्यवस्थापन व सुधारित वाणाची माहिती
देवळी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद हैदराबाद आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यावतीने कृषी विज्ञान केंद्र, सेलसूरा यांना निर्देशित कार्यप्रणालीनुसार सुधारित वाणांची माहिती, लागवड पद्धतीे आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, पीक प्रात्यक्षिक उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा आणि जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी तालुक्यातील चना टाकळी येथे शेती दिन (हरभरा) कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय लांबट तर मार्गदर्शक म्हणून सहायक व्हवस्थापक एस.एन. लोंडे, शाखा व्यवस्थापक एस.डी. नायब, जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेचे विनेश काकडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन. नेमाडे, विषयतज्ञ (पीक संरक्षण) डॉ. प्रदीप दवने, विषयतज्ज्ञ (गृहविज्ञान), प्रा. उज्वला एस. सिरसाट आदी उपस्थित होते. एस.डी. नायब यांनी खत व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. लोंडे यांनी शेतकऱ्यांना जे विकल्या जाते तेच पिकवावे आणि यासाठी सुधारित वाणांवर, खत व्यवस्थापनावर भर देण्याविषयी माहिती दिली. डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले, माती परीक्षणावर विशेष भर देऊन पिकानुसार खताची मात्रा जाणून घेत पिकाचे नियोजन करणे गरजेचे आहे. चना टाकळी येथील गजूभाऊ वडाळकर, रवी पाटील यांचे कौतुकही केले. या दोघांनी सुधारित हरभरा वाणांची निवड करून सलग लावल्यामुळे शेतकऱ्यांना तुलनात्मक निष्कर्ष लावता आला. शेती करताना शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाचा आराखडा तयार करून नियोजन अहवाल ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. प्रदीप दवने यांनी कडधान्य पिकातील कीड व रोग व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले. भाजीपाला पिकावर जैविक कीड व बुरशीनाशक फवारून मानवी जीवनावर कीटकनाशकामुळे होणारे दुष्पपरिणाम कसे टाळता येईल यावर भर दिला. प्रा. सिरसाट यांनी कडधान्याचे आहारातील महत्व आणि काढणी पश्चात तंत्रज्ञानांतर्गत कडधान्याची योग्य साठवणूक याविषयी माहिती दिली. संचालन राहुल भुजाडे, यांनी केले. यशस्वीतेकरिता किशोर इंगोले, प्रवीण भोंगाडे, प्रफुल्ल बन्सोड, प्रवीण भुजाडे, संदीप कांबळे यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)