उष्माघाताच्या रुग्णांत होतेय वाढ
By Admin | Updated: April 9, 2016 02:26 IST2016-04-09T02:26:46+5:302016-04-09T02:26:46+5:30
एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. जीवाची काहिली होणारे उन्ह तापत आहे.

उष्माघाताच्या रुग्णांत होतेय वाढ
आरोग्य विभाग सजग : बालकांमध्ये उष्म्याचे प्रमाण अधिक, दक्षता गरजेची
वर्धा : एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. जीवाची काहिली होणारे उन्ह तापत आहे. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आदी विषाणुजन्य आराजासह उष्माघाताचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. उष्माघाताबाबत आरोग्य विभागही सजग झाला आहे.
उन्हाळ्यात प्रत्येकाने आवश्यक ती दक्षता घेतल्यास उष्माघात टाळता येतो. उन्हाळ्यात शारीरिक श्रमाची कामे करणे, इमारतीच्या बाहेर काम करणे, बॉयलर रूममध्ये तसेच अधिक तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे अश्या प्रकारे तापमानातील वाढत्या परिस्थितीत सतत काम करीत असलेल्यांना उष्माघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते. यामुळे उन्हाळ्यात अशा ठिकणी काम करण्याचे टाळणे गरजेचे झाले आहे.
सध्या शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये विषाणुजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला आदी आजारांचे रुग्णही अधिक दिसून येत आहे. यातच खासगी दवाखान्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली जात आहे. यात विशेषत: लहान बालकांचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामुळे चिमुकल्यांना उन्हात घेऊन जाऊ नये, असा सल्लाही दिला जात आहे.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित काम थांबवावे, अशा रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर वा वातानुकुलित यंत्र असावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात आदी उपाय जि.प. आरोग्य विभागामार्फत सांगण्यात येत आहे.
उन्हाळ्यात बाजारात उपलब्ध कृत्रिम शीतपेय टाळावे आणि घरी उपलब्ध असणाऱ्या पारंपरिक पेयांचा उपयोग करावा, असेही आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. यात ताजे ताक, कैरीचे पन्हे, ऊसाचा रस, लिंबु शरबत, शाहाळाचे पाणी, फळाचा रस आदी प्राशन करण्याचा सल्ला आरोग्य विभाग देत आहे. यामुळे शरीरातील पोषण द्रव्याची कमतरता भरून निघते. शिवाय शरीरामध्ये चैतन्य निर्माण होऊन उष्माघातापासून संरक्षण होऊ शकते.
उष्माघाताची लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णलय, ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत, उपजिल्हा, ग्रामीण व सामान्य रुगणालयांत शीत कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)