गवळाऊ गार्इंचे संवर्धन गरजेचे

By Admin | Updated: February 22, 2016 02:15 IST2016-02-22T02:15:48+5:302016-02-22T02:15:48+5:30

वातावरणात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांची दयनिय परिस्थिती आहे. यामुळे निसर्ग कोपला की शेतकरी झोपला, ....

Grassroots need to be cultivated | गवळाऊ गार्इंचे संवर्धन गरजेचे

गवळाऊ गार्इंचे संवर्धन गरजेचे

रामदास तडस : गवळाऊ गार्इंचे विदभस्तरीय प्रदर्शन
खरांगणा (मो.) : वातावरणात दिवसेंदिवस होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांची दयनिय परिस्थिती आहे. यामुळे निसर्ग कोपला की शेतकरी झोपला, अशी व्यथा मांडतानाच शेतीसोबत गवळाऊ गाईचे संगोपण व संवर्धन करावे. यातून शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊ शकते, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
तळेगाव (रघुजी) येथे पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित गवळाऊ गार्इंच्या विदर्भस्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे तर अतिथी म्हणून आमदार अमर काळे, पशुसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले पुणे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिणा, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. अनिल कुंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल, समाज कल्याण सभापती वसंता पाचोडे, महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प. सदस्य राणा रणनवरे, नर्मदा पुराम, जि.प. सदस्य गोपाळ कालोकार, गजानन गावंडे, आर्वी पं.स. चे उपसभापती प्रल्हाद नांदुरकर, पूर्तीचे सुधीर दिवे, सरपंच नत्थू चंदनखेडे, उपेंद्र कोठेकार, राजेश बकाणे, बाबासाहेब इंगळे, बाबासाहेब गलाट, मनीष बोपटे आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलन तसेच गवळाऊ कालवडीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
विभागीय आयुक्त विश्वास भोसले यांनी गोवंश हा मानवतेला आरोग्य देणारा घटक आहे. त्याचे संवर्धन करण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याला पाच जनावरांसाठी सर्व योजनांसह विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. पशु संवर्धनासाठी आॅनलाईन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. आ. काळे यांनी हेटीकुंडी येथील इंग्रज काळापासून सुरू असलेला गवळाऊ गाईचा फार्म पुनर्जिवीत करणे गरजेचे आहे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जाईल, असे सांगितले. प्रास्ताविकातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी हे प्रदर्शन म्हणजे गवळाऊ जनावरांचे ‘शो-रूम’ आहे. आपल्या विदर्भातील वातावरणात टिकणारी व जोडधंदा तसेच दुधाचे भरपूर उत्पन्न देणारी गाय आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने तिच्या संवर्धनाकरिता योजना तयार केल्या असून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे गोपालक व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
प्रदर्शनास पिपल फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी, डॉ. अनिरूद्ध पाठक, उमाकांत फिकरीकर, गुरू, डॉ. शिंदे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
प्रदर्शनात सहभागींना पुरस्कार
गवळाऊ गार्इंचे चार विभाग पाडून उत्कृष्ट जनावरांचे जेनेटीक पद्धतीने विष्लेशन करून निवड करण्यात आली. त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात गवळाऊ दुधाळू गाय प्रकारात प्रथम विलास बुरघाटे इठलापूर, द्वितीय राजू लाड कारंजा, तृतीय देविदास राऊत काचनूर यांना, गवळाऊ वासरे प्रकारात प्रथम आकाश सपकाळ, द्वितीय धनराज बारंगे, तृतीय दिलीप कालोकार यांना, कालवडी प्रकारात प्रथम रूपेश अरबट (हेटी) खरांगणा, द्वितीय सुनील खरांडे किन्हाळा व तृतीय नितीन निकोसे खरसखांडा यांना तर वळू (नंदी) प्रकारात प्रथम गणपत निकोसे, द्वितीय किशोर बुरंगे तर तृतीय पुरस्कार ताराचंद मसराम यांना पुरकृत करण्यात आले.

Web Title: Grassroots need to be cultivated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.