दहावीतही मुलींचीच आघाडी
By Admin | Updated: June 18, 2014 00:19 IST2014-06-18T00:19:11+5:302014-06-18T00:19:11+5:30
बारावीच्या निकालानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. यंदाच्या सत्रात अभ्यासक्रम बदलल्याने हा निकाल कसा लागतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला माध्यमिक शालांत

दहावीतही मुलींचीच आघाडी
जिल्ह्याचा निकाल ८०.२७ टक्के : १९ हजार १६३ पैकी १५ हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण
वर्धा : बारावीच्या निकालानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. यंदाच्या सत्रात अभ्यासक्रम बदलल्याने हा निकाल कसा लागतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८०.२७ टक्के लागला. हा निकाल नागपूर विभागात सर्वात कमी आहे. असे असले तरी जिल्ह्यात बारावीप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतल्याचे टक्केवारीवरून दिसून आले. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.३५ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ७६.४३ टक्के आहे
नव्या अभ्यासक्रमापमाणेच जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली. जिल्ह्यात जुन्या अभ्यासक्रमाच्या तीन हजार ७३० विद्यार्थ्यांनी २४३ शाळांतून अर्ज भरला; मात्र वेळेवर तीन हजार ७२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून एकूण ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केववारी १९.०५ टक्के एवढी आहे.
नव्या अभ्यासक्रमात जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान रत्नीबाई विद्यालयातील ऐश्वर्या अनिल महाजन हिने पटकाविला. जिल्ह्यातून दुसरा क्रमांक सुशिल हिंमतसिंगका विद्यालयाच्या आशुतोष सुरेश जवादे याने तर तृतीय क्रमांक हिंगणघाट येथील सेंट जॉन हायस्कूलचा पंकज काटकर याने मिळविला. जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी देण्याचा लौकीक असणाऱ्या शाळांपैकी रत्नीबाई व सुशिल हिंमतसिंगका विद्यालय वर्धा तसेच हिंगणघाटच्या सेंट जॉन हायस्कूलने निकालात बाजी मारत त्यांची परंपरा कायम ठेवली.
दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातील ७६४ शाळांमधून एकूण १९ हजार २४६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला. १९ हजार १६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जिल्ह्यातील १६ शाळांनी शंभर टक्के निकाल दिला. तर १६ शाळांनी ९५ टक्क्यांच्यावर निकाल दिला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वर्धा तालुक्याने दिला असून त्याची टक्केवारी ८६.१० इतकी आहे तर निकाल देण्यात दुसऱ्या क्रमांकावर देवळी तालुका राहिला असून त्याची टक्केवारी ८१.२२ आहे. जिल्ह्यात सर्वात कमी ७४.१७ टक्के निकाल आष्टी तालुक्याचा आहे. बारावीत जिल्ह्यात सर्वाधिक निकाल आष्टी (शहीद) तालुक्याने दिला होता.
जिल्ह्यातील नऊ हजार ८४६ मुलांनी परीक्षा दिली. यात सात हजार ५२५ मुले उत्तीर्ण झालीत. नऊ हजार ७१७ परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींपैकी सात हजार ८५८ मुलींनी यश प्राप्त केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)