आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळतोय ‘गिरीधर टॉवर’
By Admin | Updated: January 6, 2015 23:05 IST2015-01-06T23:05:34+5:302015-01-06T23:05:34+5:30
बजाज चौक नाव उच्चारताच त्याचे भव्य स्वरुप, वाहनांची रेलचेल, लोकांची धडपड सारेकाही एका क्षणात डोळ्यासमोर उभे राहते. जमनालाल बजाज यांचा भव्य पुतळा या चौकाच्या सौंदर्यात भर घालतो़

आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळतोय ‘गिरीधर टॉवर’
वर्धा : बजाज चौक नाव उच्चारताच त्याचे भव्य स्वरुप, वाहनांची रेलचेल, लोकांची धडपड सारेकाही एका क्षणात डोळ्यासमोर उभे राहते. जमनालाल बजाज यांचा भव्य पुतळा या चौकाच्या सौंदर्यात भर घालतो़ आणखी एक गोष्ट या चौकाचे महात्म्य वाढविणारी आहे, ती म्हणजे एका कोपऱ्यात दीपस्तंभासम उभा असलेला ‘गिरीधर टॉवर’! पण, तो दुर्लक्षित आहे. एखाद्या कोपऱ्यात बसून आपल्या दुर्दैवावर हा टॉवर अश्रू ढाळत बसावा, अशी त्याची दैना झाली आहे.
७ फेब्रुवारी १९८२ रोजी तत्कालिन जिल्हाधिकारी मधुकर चौबे यांच्या हस्ते या टॉवरचे लोकार्पण झाले. लक्ष्मीनारायण गांधी यांनी काकाच्या स्मरणार्थ या टॉवरची निर्मिती केली, असा उल्लेख या टॉवरवर नमूद आहे. या चौकात हाकेच्या अंतरावर बसस्थानक आणि रेल्वे स्थानक आहे. या चौकात सतत नागरिकांची वर्दळ असते. त्यांना वेळ बघता यावी, यासाठी टॉवरवर एक घड्याळ लावलेले होते. ते आता बंद पडले आहे. या चौकाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम हा टॉवर करीत होता; पण कालांतराने त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेले. आता तर त्याकडे कुणी ढुंकूनही बघायला तयार नाही, अशी गत त्या टॉवरची आहे. याची कुणालाही खंत नाही, हे विदारक सत्य त्या चौकातून ‘टॉवर’कडे बघितल्यास लक्षात आल्यावाचून राहत नाही.(जिल्हा प्रतिनिधी)