पाण्यासाठी गावकऱ्यांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा
By Admin | Updated: May 6, 2016 01:53 IST2016-05-06T01:53:45+5:302016-05-06T01:53:45+5:30
गत दोन महिन्यांपासून गावामध्ये पाणीटंचाई आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली असता कुठलाही मार्ग निघाला नाही.

पाण्यासाठी गावकऱ्यांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा
निषेध : ग्रामवासी आक्रमक
विरूळ : गत दोन महिन्यांपासून गावामध्ये पाणीटंचाई आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली असता कुठलाही मार्ग निघाला नाही. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा नेला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरपंच हजर नसल्याने गावकऱ्यांना मडके फोडून आपला रोष व्यक्त केला.
महिलांचा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचला त्या वेळी येथे सरपंचाची उपस्थिती नव्हती. यामुळे मोर्चा घेवून गेलेल्या महिला चांगल्याच संतप्त झाल्या. हा रोष महिलांनी मडके फोडून व्यक्त केला. सध्या गावामध्ये ४-५ दिवसांच्या आड पाणी येते; परंतु नळ १० ते १५ मिनिटेच राहत असल्याने गरज भागण्याइतपत पाणी मिळत नाही. यामुळे गावातील नागरिक व महिला अधिक आक्रमक झाल्या. गावात काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले. तरीही महिला आक्रमकच होत्या.
विरूळ येथील ग्रामसेवकाचे निधन झाल्यामुळे आता नवीन ग्रामसेवक धनविज यांच्याकडे तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. त्यांनी समस्येचे निवेदन स्वीकारून लवकरात लवकर पाणी समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले.(वार्ताहर)