अंत्यविधी आटोपला; नुकसानीची झळ मात्र कायम
By Admin | Updated: June 11, 2016 02:26 IST2016-06-11T02:26:30+5:302016-06-11T02:26:30+5:30
मान्सूनच्या मुहूर्तावर ७ जून ला कारंजा तालुक्यातील बिहाडी या गावी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेतातील गोठ्याला भीषण आग लागली.

अंत्यविधी आटोपला; नुकसानीची झळ मात्र कायम
शेतकरी हवालदिल : शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा
कारंजा(घा) : मान्सूनच्या मुहूर्तावर ७ जून ला कारंजा तालुक्यातील बिहाडी या गावी दुपारी १ वाजताच्या सुमारास शेतातील गोठ्याला भीषण आग लागली. यात दीपक व अशोक धांदे यांच्या मालकाची ४२ ढोरे भस्मसात झाली. यात त्यांचे २२ लाख रूपयांचे नुकसान झाले. शेतात जेसीबीच्या सहाय्याने १५० फुट लांबीचा खोल खड्डा करून ढोरांना पुरण्यात आले. आरोग्याचे दृष्टीकोणातून हा निर्णय घेण्यात आला. या मृत गुरांचा अत्यंविधी आटोपला असला तरी धांदे यांचे दुख: आणि झालेल्या आर्थिक नुकसानीची झळ अद्यापही कायम आहे. शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा ते करीत आहे. गरज आहे.
या शंभर वर्षांच्या काळात कारंजा तालुक्यातच नव्हे तर वर्धा जिल्ह्यातही अशी घटना ऐकीवात नाही. घडलेल्या या घटनेनंतर सांत्वना देण्यासाठी आमदार अमर काळे व माजी आमदार दादाराव केचे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी दीपक व अशोक पंजाबराव धांदे यांना भेट दिली. सहानुभूती सोबतच या लोकप्रतिनिधींनी शासनाकडून आर्थिक मदतीकरिता, ठोस प्रयत्न करावे अशी अपेक्षा सदर नुकसानग्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहे. दीपक आणि अशोक धांदे या दोन भावांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून १० वर्षापूर्वी दुग्ध व्यवसाय सुरू केला.
दरवर्षी गाई-म्हशी विकत घेत आज त्यांचे गोधन ४२ व पोहोचले होते. दररोज १०० ते १५० लिटर दूध उत्पादन ते करीत असत. त्यांच्या या व्यवसायामुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही नवा आदर्श निर्माण झाला होता. केवळ शेतीवर अवलंबून न राहता पुरक व्यवसाय केल्यास आर्थिक सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सिद्ध केले. पण ७ जून ला होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे दोन्ही भाऊ मदतीची अपेक्षा व्यक्त करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)
गुरांसाठी बांधला टिनाचा गोठा
घटनेच्या दिवशी गोठ्यात ४२ गाई म्हशी बांधून होत्या. गोठ्यात कुटार कडबा, ढेप आदी साहित्यही ठेवून होते. शेजारच्या शेतात केरकचरा पेटविण्यात आला होता. दुपारी अचानक वादळ आले. वादळामुळे विस्तवाची ठिणगी कडब्याच्या ढिगावर आली. पाहता पाहता आग वाढत गेली. गुराखी आगीची माहिती देण्याकरिता गावात गेला. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र धांदे यांना आगीचा डोब दिसला, त्यांनी गाई म्हशींचे दावे सोडण्याचा प्रयत्न केला. पण आगीने झपाट्याने जोर पकडला. त्यामुळे जनावरांना पाळताही न आल्याने ,त्यांना होरपळून वा गुदमरून मृत्यू झाला. मालकासह गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गुराढोरांना वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.
मरण पावलेल्या ४२ ढोरांना शेतमालक धांदे यांच्या शेतात, जेसीबीने खोल खंडा करून पुरण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकरी यांचे दु:ख आणि झालेले अमाप नुकसान याची धग अद्याप कायमच आहे. तहसीलदार मडावी, तलाठी गद्रे, यांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेत २२ लाख रूपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचा आर्थिक अहवाला शासनाला सादर केला आहे. प्रत्यक्ष नुकसान यापेक्षा जास्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.