पलायन केलेल्या आईची १५ दिवसानंतर मुलींशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:18+5:30
चितोडा येथे रोज मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या व्यक्तीची पत्नी घरदार, कुटुंब सोडून तसेच पोटच्या मुलींना उघड्यावर सोडून प्रियकरासोबत पलायन केले. रात्र होताच मुलींना आई डोळ्याने न दिसल्याने मुलींसह वडिलांनी संपूर्ण गावात तिचा शोध घेतला. मात्र, विवाहिता कुठेही मिळून न आल्याने हताश झालेल्या पिता-पुत्रिंनी शहर पोलीस ठाण्याचा आसरा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोटच्या गोळ्यांची पर्वा न करता विवाहितेने पियकरासोबत पलायन केले होते. माझ्या आईला शोधून द्या हो... असे म्हणत दोन चिमुकल्या हुंदके देत पोलीस ठाण्यात उंबरठे झिजवत असल्याचे पाहून पोलिसांनाही गहिवरुन आले. अखेर शहर ठाण्यातील शोध पथकाने त्या मुलीेंच्या आईचा शोध घेऊन अखेर त्या मुलींना त्यांची आई मिळवून दिली.
चितोडा येथे रोज मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या व्यक्तीची पत्नी घरदार, कुटुंब सोडून तसेच पोटच्या मुलींना उघड्यावर सोडून प्रियकरासोबत पलायन केले. रात्र होताच मुलींना आई डोळ्याने न दिसल्याने मुलींसह वडिलांनी संपूर्ण गावात तिचा शोध घेतला. मात्र, विवाहिता कुठेही मिळून न आल्याने हताश झालेल्या पिता-पुत्रिंनी शहर पोलीस ठाण्याचा आसरा घेतला. दोन्ही मुली माझ्या आईला शोधून द्या हो साहेब... असे म्हणूत त्यांचे अश्रु अनावर झाले. मुलींची ही अवस्था पाहून पोलीस दादाही गहिवरले.
शहर पोलिसांनी याची तक्रार नोंदवून प्रकरण शोध पथकाकडे सोपविले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश दुर्गे, संजयसिंह सुर्यवंशी आणि नागनाथ कुंडगीर हे प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, दररोज ठाण्याच्या पायºया झिजवत बसून असलेल्या मुलींना पाहताना हे दृष्य मन हेलावून टाकणारे होते.
अखरे त्यांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आणि तब्बल १५ दिवसांच्या तपासानंतर विवाहिता सिंदी (रेल्वे) शेत शिवारात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सुरेश दुर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेत शिवार गाठून विवाहितेला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. विवाहितेच्या पतीला याची माहिती देऊन ठाण्यात बोलाविण्यात आले. तब्बल १५ दिवसांनंतर मुलींशी झालेली आईची भेट पाहून पोलिसांनाही अश्रु अनावर झाले.
अपहरण केलेली युवती नागपुरात मिळाली
वर्ध्यातील रहिवासी अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन पळवून नेले होते. युवती न सांगता प्रेमवीरासोबत घरून पळून गेली होती. याप्रकरणी शहर ठाण्यात ६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार शोध पथकाने युवतीचा शोध घेतला असता गोपनीय माहितीवरून युवती नागपूर येथे असल्याचे समजले. तब्बल १२ दिवसांनंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश दुर्गे यांच्या चमूंनी शोध घेत युवतीस नागपूर येथून ताब्यात घेत शहर ठाण्यात आणले. पोलीस उपनिरीक्षक नीतनवरे यांच्या उपस्थितीत युवतीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच आरोपीला १८ जुलै रोजी अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. तेली, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्त्वात सुरेश दुर्गे आणि त्यांच्या चमुने केली.
कॉल ट्रेसिंगवरुन लागला विवाहितेचा पत्ता
विवाहिता पळून गेल्याची तक्रार शहर ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून शोध पथकातील सुरेश दुर्गे, संजयसिंह सुर्यवंशी आणि नागनाथ कुंडगीर हे आरोपीच्या मागावर होते. सायबर सेलच्या मदतीने आरोपी आणि विवाहितेचे लोकेशन ट्रेसवरुन विवाहितेला ताब्यात घेण्यात यश आले.
मुली पळवून नेण्यामध्ये वाढ
लॉकडाऊनकाळात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दररोज अनेक पोलीस ठाण्यांमध्ये या घटनांची नोंद घेण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर अल्पवयीन मुलींना शोधण्याचे मोठे आव्हान आहे.