अपंगांचा तहसीलवर मोर्चा

By Admin | Updated: October 17, 2015 02:47 IST2015-10-17T02:47:58+5:302015-10-17T02:47:58+5:30

शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे वंचित ठरलेल्या अपंगांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

Front for the people with disabilities in Tahsil | अपंगांचा तहसीलवर मोर्चा

अपंगांचा तहसीलवर मोर्चा

दालनात अडीच तास ठिय्या : खुर्चीला घातला हार
वर्धा: शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे वंचित ठरलेल्या अपंगांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. कार्यालयात तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला हार घालून लक्ष वेधण्यात आले. तहसीलदारांच्या दालनात तब्बल अडीच तासांपर्यंत ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे विरोधात नारेबाजी करण्यात आली.
तालुक्यातील वाटखेडा येथील शासकीय काम आटोपून तहसीलदार तेजस्विनी जाधव कार्यालयात परत आल्यानंतर अपंगाचे निवेदन स्वीकारून मागण्यांची पूर्तता करण्याचे अभिवचन दिले. अपंगाची संजय गांधी निराधार योजनेची सर्व प्रकरणे निकाली काढण्यासोबतच अंत्योदय धान्य योजनेची शिधापत्रिका देण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.
प्रहार अपंग बेरोजगार संघटनेच्यावतीने आयोजित मोर्चात तालुक्यातील अपंग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा सर्वप्रथम खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी गेला. यानंतर मोर्चाने न.प.कार्यालयावर धडक दिली. खासदार तडस, नगराध्यक्ष शोभा तडस व मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी अपंगाचे निवेदन स्वीकारून येत्या १० दिवसांत मागण्या पूर्ण करण्याची हमी दिली. न.प. कोषातून करावयाच्या तीन टक्क्यांच्या खर्चातून अपंगाच्या रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी अपंग संघटनेच्या वतीने रेटण्यात आली. शहरातून निघालेल्या मोर्चात अपंग संघटनेचे प्रमोद कुऱ्हाटकर, हनुमंत झोटींग, शैलेश सहारे, सुनील मिश्रा, जयश्री कोरडे, पवन सुरकार, हरिभाऊ हिंगवे, मुरलीधर झाडे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अपंगांची शासनस्तरावर कुचंबणा
अपंगासाठी शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित असून याबाबतचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. यामध्ये तहसील कार्यालयांतर्गत अपंग व्यक्तींना संजय गांधी योजनेत सामावून घेणे, अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका उपलब्ध करून देणे, न.प. अंतर्गत उत्पन्नातील तीन टक्के निधी अपंगाच्या विकासासाठी खर्च करणे तसेच त्यांच्या अस्तित्वाची नियमित नोंद घेणे आदी योजना कार्यान्वित आहे. परंतु या सर्व योजना केवळ कागदापुरत्याच मर्यादित असून अपंगाची कुचंबणा केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात एक हजार अंतोदय धान्य योजनेचे धान्यपुरवठा कार्ड अपंगांना देण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये देवळीच्या वाट्याला १५० कार्ड आलेले आहे. परंतु या योजनेची स्थानिक तहसील कार्यालयाने मागील सहा महिन्यांपासून अंमलबजावणी न केल्यामुळे या योजनेपासून अपंग व्यक्ती वंचित ठरले आहे. तहसील कार्यालयात अपंगाची संजय गांधी निराधार योजनेची २०० प्रकरणे धूळखात पडली असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Front for the people with disabilities in Tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.