रेतीची अवैध तस्करी करणारे चार ट्रक जप्त
By Admin | Updated: February 20, 2017 01:11 IST2017-02-20T01:11:45+5:302017-02-20T01:11:45+5:30
लिलाव न झालेल्या रेतीघाटांवरून अमरावती येथे तस्करी करणारे चार ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली.

रेतीची अवैध तस्करी करणारे चार ट्रक जप्त
२४.७२ लाखांचा ऐवज सील : ट्रक चालकांना अटक; मालकांवरही गुन्हे
वर्धा : लिलाव न झालेल्या रेतीघाटांवरून अमरावती येथे तस्करी करणारे चार ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली. यात २४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चारही ट्रक चालकांना अटक करून ट्रक मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुलगाव येथे ही कारवाई केली.
राहुल डोलारे, प्रल्हाद राऊत, गणेश धुर्वे आणि दीपक वानखेडे सर्व रा. अमरावती अशी अटकेत असलेल्या ट्रक चालकांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर या चार पैकी तीन ट्रक अमरावती येथील नदीम अश्पाक महंमद अब्दुल सतीर याचे असल्याचे समोर आले. तर अन्य एक ट्रक मज्जू शहा वल्द मकबुल शहा रा. अमरावती याचा असून या दोघांवरही भादंविच्या गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळी तालुक्यातील वाघोली आणि निमगव्हाण येथील रेती घाटाचा लिलाव झाला नसताना येथून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी करून या घाटावरून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ कुठलाही परवाना नसल्याचे दिसून आले. यावरून चारही ट्रक जप्त करून ठाण्यात उभे करण्यात आले. या कारवाईत ७२ हजार रुपयांची रेती आणि ट्रक जप्त करण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, उपनिरीक्षक आचल मलकापुरे, सहायक उपनिरीक्षक उदयसिंह बारवाल, नरेंद्र डहाके, दिवाकर परिमल, सचीन खैरकार, समीर कडवे व संजय ठोंबरे यांनी केली.(प्रतिनिधी)
रेतीचोरी करताना ट्रॅक्टर जप्त
वर्धा - रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असताना पोलिसांनी ट्रॅक्टरसह रेतीसाठा जप्त केला. ही कारवाई देवळी एमआयडीसी परिसरात रविवारी सकाळी केली. पोलीस सुत्रानुसार, देविदास धुर्वे ट्रॅक्टर क्र.एम.एच.३२-१४९९ ने रेती घेऊन येत होता. पोलिसांनी वाहन थांबवून कागदपत्राची तपासणी केली, असता त्याच्याकडे कोणतेच कागदपत्र आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत ५ लाख ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त के ला आहे.