चार प्रकल्पांनी गाठला तळ
By Admin | Updated: March 3, 2016 02:04 IST2016-03-03T02:04:53+5:302016-03-03T02:04:53+5:30
जिल्ह्यात यंदाच्या सत्रात सरासरीच्या तुलनेत पुरेपूर पाऊस आला असला तरी पावसात सातत्याचा अभाव होता.

चार प्रकल्पांनी गाठला तळ
चाहुल पाणी संकटाची : लघु प्रकल्पाची स्थितीही नाजूक
वर्धा : जिल्ह्यात यंदाच्या सत्रात सरासरीच्या तुलनेत पुरेपूर पाऊस आला असला तरी पावसात सातत्याचा अभाव होता. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्णत: भरले नसल्याचे दिसून येते. परिणामी, उन्हाळ्याच्या प्रारंभीच चार जलाशयांनी तळ गाठल्याचे समोर आले आहे. यात पोथरा, डोंगरगाव, पंचधारा व मदन उन्नई या चार जलसाठ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त छोट्या प्रकल्पांची स्थितीही तशीच आहे.
जिल्ह्यात एकूण १५ प्रकल्पांच्या जलाशयाची पातळी नोंदविली जाते. यातील मोजक्याच प्रकल्पाचे पाणी जिल्ह्याच्या उपयोगी पडत असल्याचे सांगण्यात येते. या १५ जलाशयांमध्ये आजच्या घडीला केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामुळे येत्या दिवसांत जिल्ह्यात पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १५ प्रकल्प व २० तलावांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची तहाण भागविली जात असून सिंचन व औद्योगिक वापराकरिता पाणी दिले जाते. या धरणात असलेल्या जलसाठ्याच्या आधारावर जिल्ह्याचे सिंचन, पिण्याचे पाणी आणि कारखान्यांना मिळणारे पाणी अवलंबून आहे. या बाबींकरिता जलसाठा आरक्षित असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले असले तरी तळाला जात असलेल्या जलसाठ्यामुळे चिंता वाढली आहे.
यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करताना सतर्क राहण्याची वेळ आली आहे. पाण्याचा अतिरिक्त होत असलेला वापर टाळण्याची गरज यातून निर्माण झाली आहे. याचा विचार नागरिकांनीच करण्याची वेळ आली आहे.(प्रतिनिधी)
छोट्या प्रकल्पांत २३.४३ टक्के जलसाठा
जिल्ह्यात एकूण २० लघुप्रकल्प आहेत. यातील पाणी यंदाच्या वर्षात मार्च महिन्याच्या प्रारंभीच खाली आल्याचे दिसून येत आहे. या २० प्रकल्पांत सरासरी २३.४३ टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले. यातील काही प्रकल्प तळाशी जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.