जिल्ह्यात तीन अपघातात चार जणांचा मृत्यू
By Admin | Updated: February 20, 2016 02:58 IST2016-02-20T02:58:15+5:302016-02-20T02:58:15+5:30
जिल्ह्यात शुक्रवार अपघात वारच ठरला. यात हिंगणघाट तालुक्यात झालेल्या दोन अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर देवळी येथील ....

जिल्ह्यात तीन अपघातात चार जणांचा मृत्यू
दोघे गंभीर : देवळीतील एक तर हिंगणघाट येथील दोन अपघात
वर्धा : जिल्ह्यात शुक्रवार अपघात वारच ठरला. यात हिंगणघाट तालुक्यात झालेल्या दोन अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर देवळी येथील अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
पती ठार, पत्नी व मुलगी गंभीर
देवळी : भरधाव ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालक जागीच ठार झाला, तर मागे बसलेली त्याची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास रत्नापूर शिवारात घडली. अमर हरिभाऊ खैरकार (४५) रा. सरपधरी ता. कळंब जि. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. शीला खैरकार (३५) आणि साची खैरकार (६) अशी जखमींची नावे आहे.
पोलीस सुत्रानुसार, संतोष खैरकार हे एमएच २९ एबी ७६६५ या दुचाकीने पत्नी व मुलीसह वर्धा येथे लग्न कार्यासाठी येत होते. दरम्यान, रत्नापूर शिवारात वर्धेवरून यवतमाळकडे एमएच २९ एम ८१७८ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अमर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शीला व मुलगी या दोघी जखमी झाल्या. त्यांना सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक संतोष मिश्रा याला ताब्यात घेतले आहे.
कार अपघातात एक ठार
हिंगणघाट - येथील राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात चिचघाट फाट्याजवळ नागपूर कडून येणारी मारोती कार रस्ता विभाजकार आदळली. या अपघातात कारचालक लोभेश शैलेश पटेलिया (१७) रा. संत चोखोबा वॉर्ड याचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, घरी रात्री झोपून असलेला लोभेश घरून केव्हा कार धेवून गेला याची माहिती आई वडिलांना नाही. लोभेश हा अकराच्या वर्गाचा विद्यार्थी होता. या अपघाताची माहिती पोलिसांना पहाटे ५.३० वाजता माहिती मिळाली. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून पोलीस जमादार हवालदार अन्ना दुर्गे व शिपाई अनिल नक्षीणे तपास करीत आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार
हिंगणघाट - राळेगाव येथून निधा टाकळीकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव अनोळखी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात गुरूवारी रात्री कापसी ते सिरसगाव मार्गावर घडला. संजय रामदास तुळसकर (२७) रा निधा(टाकळी), निलेश विनोद मुते (३२) रा. इंझाळा अशी मृतकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तुळसकर आणि निलेश मुते हे दोघेही एम.एच. ४० सी ६९७१ या दुचाकीने राळेगाव येथून निधा (टाकळी)कडे जात होते. दरम्यान मागावून येणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ ठप्प होती. याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली.