शेतीच्या पांदण रस्त्यांकरिता चार कोटी
By Admin | Updated: February 9, 2016 01:43 IST2016-02-09T01:43:31+5:302016-02-09T01:43:31+5:30
जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ च्या प्रारुप आराखड्यापासून मिळणाऱ्या निधीतून लोकप्रतिनिधींनी रस्ते विकासावर भर न देता पांदण रस्ते करावे.

शेतीच्या पांदण रस्त्यांकरिता चार कोटी
सुधीर मुनगंटीवार : जिल्हा नियोजन आराखडा
वर्धा : जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ च्या प्रारुप आराखड्यापासून मिळणाऱ्या निधीतून लोकप्रतिनिधींनी रस्ते विकासावर भर न देता पांदण रस्ते करावे. त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ना. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ (सर्वसाधारण) प्रारुप आरखड्यात मंजुरीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, आ. अमर काळे, अपर मुख्य सचिव (नियोजन) सुनील पोरवाल, सचिव (व्यय) सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना उपस्थित होते.
मत्स्यसंवर्धनाकडे लक्ष देण्याच्या सूचना
जिल्ह्यात ज्या ठिकाणी मत्स्यसंवर्धनासाठी वाव आहे. त्याठिकाणी मत्स्यसंवर्धनासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा. ग्रामपंचायतीचे नवीन बांधकाम मागणी, आरोग्य केंद्राचे बांधकामासाठी निधी, पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी निधी, दलित वस्तीमध्ये सुधारणा, नगरउत्थान, विद्युत, नगरपंचायतीसाठी वाढीव निधी, अशा कामांसाठी निधीत वाढ करण्यात येईल. कामांची गणुवत्ता पाळ्याच्या सूचनाही केल्या.
कृषी व आरोग्याकरिता निधी वाढवा
जिल्ह्यात कृषी व आरोग्यासाठी निधीची मागणी कमी असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. ज्या योजना उत्पादन वाढविण्यात उपयोगी पडतील अशा योजनांसाठी वाढीव निधी निश्चितच वाढविला जाईल.
गटविकास अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
१४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात आल्यामुळे हा निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्यात यावे. देवळी व हिंगणघाट ग्रामीण रुग्णालयाच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात याव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.