शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी प्रथमच विद्यार्थ्यांविना ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:21+5:30

कोरोना प्रकोपामुळे अद्यापही शाळा सुरु झाल्या नसल्याने विद्यार्थी शाळांपासून लांबच आहेत. तसेच कोरोनाचे रुग्णही दिवसेंदिवस वाढतच असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होऊ नयेत, याकरिता ऑनलाईन शिक्षणावरच शाळांमधील अध्यापनाचे कार्य सुरु आहेत. शनिवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७३ वा वर्धापन दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे.

Flag hoisting without students for the first time in schools on Independence Day | शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी प्रथमच विद्यार्थ्यांविना ध्वजारोहण

शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी प्रथमच विद्यार्थ्यांविना ध्वजारोहण

ठळक मुद्देकोरोना विषाणू संसर्गाचा धसका : शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची राहणार उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाळ्यापासून सुरु झालेल्या कोरोनाचा प्रकोप सहा महिन्यानंतरही कायम असल्याने अनेक सण, उत्सवांवर विरजण पडले. याचाच परिणाम आता स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवावरही पडला आहे. यावर्षी साध्यापणाने स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याचे आदेश शासनाने दिल्याने पहिल्यांदाच शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांविना ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाकरिता फक्त शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
कोरोना प्रकोपामुळे अद्यापही शाळा सुरु झाल्या नसल्याने विद्यार्थी शाळांपासून लांबच आहेत. तसेच कोरोनाचे रुग्णही दिवसेंदिवस वाढतच असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होऊ नयेत, याकरिता ऑनलाईन शिक्षणावरच शाळांमधील अध्यापनाचे कार्य सुरु आहेत. शनिवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७३ वा वर्धापन दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाकरिता दरवर्षी शाळा, महाविद्यालयामध्ये आधल्या दिवशी पासूनच तयारी सुरु व्हायची. शाळांचा परिसर तोरणांनी सजविला जायचा.
स्वातंत्रदिनी विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढल्या जायची. विद्यार्थ्यांसह मान्यवरांचे भाषणही व्हायचे पण, यावर्षी कार्यक्रमांवर मर्यादा आल्याने केवळ ध्वजारोहण करण्यावरच भर दिला जाणार आहे. शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यच आणि ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टंन्सिंग पाळून सर्वांनी मास्कचा वापर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहे.

स्वातंत्र्यसैनिकास ध्वजारोहणाची संधी
मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे अद्यापपर्यंत होऊ शकलेल्या नाही. त्यामुळे जवळपास १५ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यामध्ये एका प्रशासकाकडे अनेक ग्रामपंचायतीचे पदभार असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जास्त पदभार असलेल्या प्रशासकाने एका ग्रामपंचायतीची निवड करुन तेथे ध्वजारोहण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तर प्रशासक असलेल्या इतर ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र संग्राम सैनिकांना प्राधन्य देण्याच्या सूचना निर्गत करण्यात आल्या आहेत. पण, स्वातंत्र्य सैनिक यांची प्रकृती उत्तम असल्यास त्यांना प्राधान्य राहणार आहे. तसे नसल्यास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पद रिक्त असल्यास ग्रामसेवक किंवा यापैकी तिन्ही शक्य नसेल तर गटविकास अधिकाऱ्यांनी एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही निर्देश आहेत.

ऑनलाईन कार्यक्रमाला प्राधान्य असावे
स्वातंत्र्यदिनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम घेतला जातो. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टंन्सिग ठेवून गर्दी होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन वादविवाद, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर गीत, देशभक्तीपर निबंध, भाषण आणि कविता स्पर्धा ऑनलाईन घेण्यात याव्या, जेणे करुन कोरोना काळातही स्वातंत्र्यदिनाचा उत्सव सर्वांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरा करता येईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Flag hoisting without students for the first time in schools on Independence Day