गाव तिथे प्रवासी निवारा योजनेचा फज्जा
By Admin | Updated: June 16, 2014 23:39 IST2014-06-16T23:39:55+5:302014-06-16T23:39:55+5:30
महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली.

गाव तिथे प्रवासी निवारा योजनेचा फज्जा
दारोडा : महामंडळाने दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी व प्रत्येक गाव शहराशी जोडले जावे यासाठी बसेसची सुविधा केली. तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. परंतु आजघडीला बहुतेक गावातील प्रवासी निवारे अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम गावापासून १ ते २ कि़मी. अंतरावर करण्यात आले. पण मधल्या काही काळात त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या प्रवासी निवाऱ्यांची अत्यंंत दुरवस्था झाली. प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस सहन करीत तासनतास बसची वाट पाहत रहावे लागत आहे.
होत असलेल्या असुविधेमुळे गाव तिथे प्रवासी निवारा ही योजना शासनाचा निधी बुडविणारीच ठरली अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून उमटत आहे. ही योजना राबवूनही अद्याप काही गावांमध्ये प्रवासी निवाराच नाही. अशा गावांमध्ये महामंडळाची बस थांबण्याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रवाशांना कुठे थांबावे हा प्रश्न पडला आहे.
राज्यात एस.टी. प्रवासाचे मुख्य साधन आहे. शासनाने मोठा गाजावाजा करीते ही योजना राबविली. पण योजनेचे फलित मात्र साध्य झाले नाही. त्यातच ग्रामीण भागात बसेसची अवस्थाही अतिशय दयनीय झाली आहे. एक बस गेल्यावर दुसरी बस येण्यासाठी तासंतास वाट पहावी लागते. अनेकदा वाहक व चालक प्रवाशांशी, विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तवणूक करतात. गत काही महिन्यात अशा तक्रारी वाढल्या आहेत. या योजनेचा फज्जाच उडाल्याने याकडे लोक प्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनानेही याची दखल दखल घेवून, गाव तिथे प्रवासी निवारो व्हावे अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)