पवनारात साकारणार जिल्ह्यातील पहिली ‘ई-लायब्ररी’
By Admin | Updated: December 10, 2015 02:20 IST2015-12-10T02:20:37+5:302015-12-10T02:20:37+5:30
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांच्या अवांतर वाचनावर भर देणे आवश्यक आहे. त्यातच वाचनाची माध्यमेही ...

पवनारात साकारणार जिल्ह्यातील पहिली ‘ई-लायब्ररी’
हर्षल तोटे पवनार
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांच्या अवांतर वाचनावर भर देणे आवश्यक आहे. त्यातच वाचनाची माध्यमेही बदलून त्यात अनेक ईलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शिरकाव केला आहे. हीच बाब हेरून पवनार येथील ग्रामपंचायतने नागरी सुविधा योजनेंतर्गत ई-लायब्ररी तयार करण्याचा ठराव पारित केला आहे. एवढेच नव्हे तर निर्मितीप्रक्रियेलाही सुरूवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळी ही लायब्ररी जिल्ह्यातील पहिली ई-लायब्ररी ठरणार आहे.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी आणि विनोबांचे गाव अशी पवनारची ओळख आणखी प्रगल्भ व्हावी, यासाठी हा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ही लायब्ररी वाय फाटा युक्त राहणार असून विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार युवकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. या लायब्ररीमध्ये स्पर्धा परीक्षेकरिता लागणारी पुस्तके, काम्प्युटर्स, इंटरनेट, शेती उपयोगी पुस्तके, मासिकं यासह विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी लागणारे संपूर्ण अभ्यासोपयोगी साहित्य येथे उपलब्ध होणार असल्याची माहिती सरपंच अजय गांडोळे यांनी दिली. याकरिता लागणारा निधी नागरी सुविधा योजनेंतर्गत अभ्यास केंद्र या सदराखाली उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.
सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्यामध्येही पवनार विभागातील अनेक योजना समाविष्ट करण्यात आला असून पर्यटनाच्या सुविधेवर भर देण्यात आला आहे. नंदी खेडा परिसरात सुद्धा १९.८६ लक्ष रू. सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले असून १३ लक्ष रूपयांच्या सभागृहाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. यामुळे नंदीखेडा परिसरात उत्तरक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांची अडचण दूर होणार आहे. त्याचप्रकारे २०१४-१५ चा वार्षिक अहवाल सुद्धा ग्रा. पं. ने आपल्या करदात्यांना देऊन नवीन पायंडा पाडला आहे. करदात्यांना आपल्या कराचा वापर कश्यासाठी होतो ही माहिती देणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असल्याचे सरपंच अजय गांडोळे सांगतात. कर रूपातून व शासनाच्या विविध योजनेंतर्गत जमा झालेल्या निधीपैकी ३७ लक्ष ४१ हजार २८८ रू. नागरी सुविधेंतर्गत खर्च झाले आहे. एप्रिल अखेरची अंतिम शिल्लक १५ लक्ष ४७ हजार ७३० रू. दाखविण्यात आले आहे. अश्या प्रकारचा वार्षिक अहवाल करदात्यांना देणारी पवनार ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरणार आहे. असे असतानाही महिलांनी पुढाकार घेऊनसुद्धा दारूबंदीची चळवळ मात्र काही प्रमाणात क्षीण झालेली दिसते. त्यामुळे गावात संपूर्ण दारूबंदी असतानाही दारूचे पाट मात्र वाहतच आहे. याकडेही लक्ष देत दारूबंदीसाठी एखादा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.