प्रदूषणामुळे ‘चिमण्या’ जीवांचा अस्तित्वाचा लढा
By Admin | Updated: June 18, 2014 00:20 IST2014-06-18T00:20:18+5:302014-06-18T00:20:18+5:30
माळरानातील शेतात उडताना दिसणारे देवचिमण्यांचे थवे आता दृष्टीस पडत नाही. या लहानशा जीवाची कालौघात काहीली होत त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. पूर्वी घराच्या अंगणातही देवचिमण्यांचा वावर होता;

प्रदूषणामुळे ‘चिमण्या’ जीवांचा अस्तित्वाचा लढा
वर्धा : माळरानातील शेतात उडताना दिसणारे देवचिमण्यांचे थवे आता दृष्टीस पडत नाही. या लहानशा जीवाची कालौघात काहीली होत त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. पूर्वी घराच्या अंगणातही देवचिमण्यांचा वावर होता; पण आता सिमेंटच्या जंगलात देवचिमण्या गावात तर नाही; पण जंगलातही अभावानेच दिसतात.
देवचिमण्यांच्या संवर्धनाकरिता कुठेही प्रयत्न होत नाही. ही बाब प्रकर्षाने पुढे येत असल्याने वनअभ्यासक कौशल मिश्र यांनी देवचिमण्यांच्या संवर्धनासह जपणुकीचे आवाहन केले आहे. देवचिमण्या कळपाने राहतात. एका कळपात किमान ७० ते ८० चिमण्यांचा समूह दिसायचा. आता एका कळपात २० ते ३० चिमण्यांपेक्षा अधिक देवचिमण्या दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देवचिमण्यांच्या चिवचिवाटाला एक लय असते. त्यांचा लहान आकार, समुहाने जगण्याची पद्धत आगळीच आहे. त्यांच्या अंगणातील आगमनासोबतच गावखेड्यात, शेतात उल्हासाचे वातावरण तयार होत असे. सुगरण गवतावरील ‘बी’ टिपण्यास उतरणारे देवचिमण्यांचे थवे नेत्रसुख देत होते. त्यातून शेतातही सकाळी तसेच सायंकाळी उत्साहाचे वातावरण तयार होत असे. घराच्या अंगणात आलेल्या देवचिमण्यांचे कुटुंबातील लहान मुलांसह सगळ्यांनाच कौतुक होते; पण निसर्गाची लय हरपण्याच्या प्रक्रियेत देवचिमण्यांचे अस्तित्वही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. (कार्यालय प्रतिनिधी)